०९ मे २०१७

हुंडा आणि राष्ट्रवाद ?



हुंडा आणि राष्ट्रवाद ?

हुंडा घेणारे देणारे अथवा त्या प्रथेचे समर्थन करणारे राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रवादी ठरू शकणार का ? हुंड्या सारख्या अमानवीय प्रथेला समर्थन करणाऱ्याला आणि त्या प्रथेचा व्यक्तिगत स्वार्थासाठी आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी वापर करणाऱ्यांना अनैतिक, राष्ट्रद्वेष्ट्ये, राष्ट्रद्रोही ठरवणार का  ?


भारतीय कुटुंब संस्थेचा प्रमुख भाग म्हणून नेहमीच विवाह संस्थेकडे बघितले जाते. जगात कशा पद्धतीने कुटुंब संस्था उद्ध्वस्त होत आहे आणि आपल्याकडे ती कशी टिकून आहे याविषयी नेहमीच अभिमानाने व अनेकदा  अभिनिवेशाने, गर्वाने बोलले जाते. या सर्व चर्चेत विवाह संस्थेचा पाय काय आहे हा मूलभूत प्रश्न मात्र तेवढ्याच नियमितपणे  टाळला जातो. कारण आत्मपरीक्षणाची आणि सुधारणावादी भूमिका घेतल्याने हितसंबंध बाधित होतील अशी भीती. असे असताना देखील हुंडा घेऊन आणि देऊनही आम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी अशी या जमातीची अपेक्षा असते. ही अपेक्षा समाजही मनमोकळेपणाने पूर्ण करतो. असे करताना दांभिकतेच्या सर्वोच्च टोकावर बसल्याची जाणीवही संबंधितांना रहात नाही.

भारतीय परिप्रेक्षात विवाह संस्थेचा पाया काय आहे याचे उत्तर इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी संशोधनात्मक वृत्तीने  "भारतीय विवाह संस्थेचा इतिहास" या मौल्यवान ग्रंथात अनेक ऐतिहासिक संदर्भांसह दिले आहे. संपत्ती, अधिकार, वर्चस्व असा प्रवास असलेली ही व्यवस्था पुरुषी मानसिकतेचा एक अद्भुत नमुना आहे. यातून पुरुषांचे हितसंबंध जोपासताना स्त्रियांचे माणूसपण नाकारण्यालाही कुणाची हरकत उरली नाही.


नैतिकता आणि हुंडा

आज मितीस हुंडा पद्धत विवाह संस्थेचा गाभा बनली आहे. कायद्याने हुंडा घेण्यास अथवा देण्यास बंदी असली तरी सरसकटपणे हुंडा दिला आणि घेतला जातो. नैतिक आणि अनैतिक कृत्यांचा उहापोह करणारा आपला समाज (कुणी कसे कपडे घालावे ? कोणी काय खावे ? मुलामुलींनी एकत्र भेटावे कि भेटू नये, बोलावे की बोलू नये, प्रेम करावे की करू नये, किती मुले जन्माला घालावी ? अशा) अनेक विषयांवर चर्चा करतो पण हाच समाज हुंडा घेण्याला अनैतिक, अश्लील ठरवण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. हे अपयश प्रयत्नांनंतर येणारे नसून प्रयत्नांअभावी आलेले आहे हेही लक्षात घ्यावे लागेल.  त्यामुळे नैतिकतेचा, शीलतेचा आग्रह हा फक्त मुखवटा तर नाही ना ? अशी रास्त शंका उपस्थित होते.

सामाजिक प्रतिष्ठा, मान्यता आणि हुंडा यांचा संबंध तपासला असता लक्षात येते की हुंडा देणार्याला आणि घेणाऱ्याला आपल्या समाजात प्रतिष्ठेचे आणि मानाचे स्थान दिले जाते. त्यातूनच मग मी माझ्या मुलाच्या लग्नात एवढा हुंडा घेतला आणि मुलीच्या लग्नात एवढा हुंडा दिला असे फुशारकीने सांगितले जाते. महिलांमध्येही हा विषय खूपच प्रतिष्ठेचा मानला जातो व त्यानुसार चर्चिला जातो. या चर्चा करत असताना स्त्रियांच्यातील पुरुषीपणाचे दर्शन घडत असते. अशा प्रकारच्या उदाहरणांतून हे स्पष्टपणे दिसते की पुरुषत्व हे फक्त पुरुषांची मक्तेदारी राहिली नसून त्यात महिलाही आघाडीवर येण्याच्या प्रयत्नात आहेत. श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेद करताना  मुलाची बाजू श्रेष्ठ आणि  मुलीची बाजू कनिष्ठ आहे हे दाखवण्याची चढाओढ हे काही समानतेचे लक्षण नाही. श्रेष्ठ असणाऱ्याला कनिष्ठ बनवणे आणि कनिष्ठ असणाऱ्याला श्रेष्ठ बनवणे हा काही समानतेचा मार्ग निश्चितच नाही. ही शंका खोटी ठरण्यासाठी समाज म्हणून आपण सर्वांनी हे अपयश मान्य करत हुंड्याच्या विरोधी  एकत्रितपणे माणुसकीच्या दृष्टिकोनातून काम करणे काळाची गरज बनली आहे.

शीतल वायाळ या तरुणीच्या आत्महत्येनंतर हुंड्याचा विषय पुन्हा एकदा माध्यमांच्या बातमीचा विषय ठरला आहे. हुंड्याने आत्महत्या होते की समाजमान्य रूढी परंपरांद्वारे खून होतो ? हे ठरवायला हवे. शीतलचा विषय चर्चा विश्वात येण्यामागे शीतलने जीवनप्रवास संपवण्या अगोदर चिट्टीद्वारे व्यक्त केलेले मत आहे. नाहीतर आपल्या आजूबाजूला हुंडा आणि तत्सम रूढींनी घेतलेल्या बळींची संख्या काही कमी नाही. हे बळी लग्ना अगोदरचे आहेत तसेच लग्नानंतरचे देखील आहेत. तरीही हे बळी चर्चेत न येण्यामागे त्यांची न झालेली अभिव्यक्ती हेच असते. हुंडा बळीच्या अमानवीय घटना समाजाने संवेदनशीलपणे समजून घ्याव्यात आणि तसे होऊ नये म्हणून सक्रिय प्रयत्न करणे गरजेचे असते, या घटना चर्चेत येणे यासाठीच महत्वाचे आहे.

सक्रिय प्रयत्न काय असावे याचे चांगले उदाहरण पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे अनुभवायला मिळाले. तेथे पुण्यातील आणि पुण्याबाहेरील अनेक तरुण तरुणींनी एकत्र येऊन या हुंडा पद्धतीला स्वतःपासून संपवण्याचा निर्धार केला. हा निर्धार या तरुणांनी फक्त बोलूनच दाखवला नाही, तर १०० रुपयांच्या मुद्रांकावर लिहून दिला आणि तो निर्धार पाळण्यात आमच्याकडून कसूर झाली तर शासनाने आमच्यावर कारवाई करावी असे आवाहनही केले. कायदा करून अंमलबजावणी न करणाऱ्या शासनाला आणि प्रशासनाला हे पाऊल चपराक लगावणारे ठरले. संविधानाची शपथ घेऊन संविधानिक जबाबदारीच्या पदांवर बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी कायद्याची अंमलबजावणी करणे हे अपेक्षित असते. मात्र वास्तविक हेच मंत्री, अधिकारी हुंडा बंदीचा कायदा धाब्यावर बसवून संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन करत हुंडा घेत आहेत. या सर्वांची हुंड्याचे नवनवीन अविष्कार शोधण्यात सर्जनात बघितली तर अवाक व्हायला होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत म्हणूनच महात्मा फुले वाड्यातील परिवर्तनवादी आणि कृतिशील तरुणांकडून स्वतःच्या आयुष्यात बदल घडवणे आणि त्या बदलांबद्दल कटिबद्धता व्यक्त करणे अधिक महत्वाचे ठरते.



मराठा क्रांती मोर्चा आणि हुंडा -



काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात लाखांच्या संख्येत बाहेर पडणारे मोर्चे आणि त्या मोर्च्याचे नेतृत्व करणारे बोलेरो आणि स्कॉर्पियो धारक नेते आरक्षणाची मागणी करताना आपण सर्वांनीच पाहिले. मोर्च्याच्या लाखांच्या संख्येत अनेक लाखांच्या आणि कोटीच्या गाड्या बघताना बघणार्यांना नेत्यांच्या आर्थिक मागासलेपणाची पुरेशी स्पष्ट जाणीव झाली असावी आणि म्हणूनच हा क्रांती मोर्चा सर्वसामान्यांचा एकही प्रश्न मार्गी न लावता अस्तित्व हरवून बसला. असे होण्याला मोर्चामागील राजकीय अजेंडा आणि सरकारची विधायक प्रश्न न सोडवण्याची मनोवृत्ती जबाबदार ठरली. शांततापूर्ण मार्गाने आपली मागणी मांडणे याबाबत या मोर्च्यात सहभागींचे आणि नेतृत्वाचे अभिनंदन व्हायला हवे होते आणि ते झालेही. मोर्चात सहभागी झालेल्या स्त्रियांची संख्या आणि सहभाग हा देखील दखल घ्यायला लावणारा आणि महत्वाचा बदल सुचवणारा होता. स्त्रीवर अत्याचार झाला तर स्त्रिया एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतात हे दृश्य भविष्यात स्त्रियांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आशावाद निर्माण करणारे होते. परंतु त्या मोर्च्यात लाखांच्या संख्येत बाहेर पडलेल्या स्त्रिया आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असणारे पुरुष आज हुंडा हा स्त्रियांचा गंभीर प्रश्न आहे हे वास्तव स्वीकारणार की नाही ? मराठा क्रांती मोर्च्याची हुंड्याच्या माध्यमातून होणारे स्त्रीचे शोषण रोखण्याबाबत काय भूमिका आहे ? अन्याय आणि अत्याचाराला जातीच्या चष्म्यातून बघण्याची वृत्ती चुकीची असून स्वतःपासून हुंडा बंदीची भूमिका घेण्याचे धाडस हा मोर्चा दाखवणार का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहत आहे. तरुण पिठी या प्रश्नांचा तटस्थपणे विचार करून राजकीय नेत्यांची व्यक्तिगत स्वार्थासाठीची आंदोलने आणि समाजपरिवर्तनाची आंदोलने यात नक्कीच फरक करू शकतील यात शंका नाही.


राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद आणि हुंडा



भक्ती ही राष्ट्राची असो, व्यक्तीची असो वा विचाराची असो त्यात तर्काला आणि मुद्द्यांना अजिबातच महत्व नसते. पण किमान प्रेमात काळजी, निस्वार्थ वृत्ती आणि आपलेपणा असणे अपेक्षित असते. तसेच वाद म्हटले की विचार, मतभिन्नता, तर्क, युक्तिवाद हे येतात.


आज राष्ट्रावर प्रेम करणे, राष्ट्राप्रती निष्ठा व्यक्त करणे म्हणजे राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्राचा नकाशा अशा प्रतिकांवर प्रेम करणे, निष्ठा ठेवणे एवढ्यावर मर्यादित झाला आहे. आपल्या राष्ट्रातील माणसांचे माणूसपण मान्य करत ते माणूसपण टिकवण्यासाठी भूमिका घेणे हाच राष्ट्रप्रेम, राष्ट्रवादाचा खरा अर्थ या स्वार्थी, हेतुपुरस्कृत नवराष्ट्रवादात दिसत नाही. त्या राष्ट्रात राहणाऱ्या माणसांना आपले मानत त्यांच्यावर प्रेम करणे ही उदात्त भावना या मूळ संकल्पनांच्या मागे असताना हुंडा घेणारे देणारे अथवा त्या प्रथेचे समर्थन करणारे राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रवादी ठरू शकणार का ? हा प्रश्न विचारण्याची आवश्यकता पडत आहे. राजकारणासाठी भ्रामक नवराष्ट्रवादाला जन्म घालणारे राजकारणी आपल्या गुंड  प्रवृत्तीच्या लोकांना फक्त राजकीय स्वार्थासाठी देशभक्त आणि राष्टवादी ठरवतात तेव्हा सद्सद्विवेकी माणसाने हुंड्या सारख्या अमानवीय प्रथेला समर्थन करणाऱ्याला आणि त्या प्रथेचा व्यक्तिगत स्वार्थासाठी आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी वापर करणाऱ्यांना अनैतिक, राष्ट्रद्वेष्ट्ये, राष्ट्रद्रोही ठरवणार का  ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा