२८ ऑगस्ट २०१९

हिरोची वाट न पाहता प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी यासाठी प्रेरणा देणारं "कलम १५"

आर्टिकल 15 हे नाव चित्रपटाला देण्याआधी आणि हा चित्रपट आहे हे माहिती होण्याच्या खूप आधीपासून हे नाव आणि त्या अंतर्गत असलेल्या भारतीय संविधानातील तरतुदींनी येथील माणूसपण नाकारले गेलेल्या समाजाला माणूसपणाच्या स्तरावर आणण्याचे अभिवचन दिले आहे. तो प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असल्याचं संविधानाचे हे कलम सांगते.

भारतीय संविधानातील कलम 15 भारतातील कोणत्याही नागरिकासोबतच्या भेदभावाला विरोध करते. धर्म, जात, वर्ण, लिंग किंवा जन्म ठिकाणावरून भेदभाव करण्यास हे कलम बंदी घालतं. ही बंदी केवळ भारतातील नागरिकांसाठीच नाही तर शासन आणि प्रशासनाला देखील काम करताना याचं भान ठेवायला सांगते. या तरतुदी हे प्रश्न भविष्यात तयार होतील म्हणून केल्या नव्हत्या तर तर हजारो वर्षांपासून हा अमानवीय, क्रूरपणा सुरू असून तो थांबायला हवा म्हणून केल्या गेल्या.

माझ्या वाट्याला आलेला न आलेला जीवघेणा अनुभव, जगणं नाकारणारा अनुभव इतर कोणी घेत असेल तर काय करायला हवं हा प्रश्नही आपल्याला पडायला हवा. त्याआधी हे असं काही घडतंय हे मान्य करायला हवं आणि हे मान्य होण्यासाठी तो प्रश्न तेवढ्याच गांभीर्याने आपल्यापर्यंत पोहचायला हवा म्हणून चित्रपट हे ताकदीचं माध्यम आहे.

भावनात्मक पातळीवर खोलवर परिणाम होण्यासाठी आवश्यक दृकश्राव्य क्षमता या अभिव्यक्ती माध्यमाच्या आहेत. म्हणूनच "आर्टिकल 15" या चित्रपटाचं महत्व बॉक्स ऑफिसवर किती गल्ला जमवला यावर नसून येणाऱ्या किती पिढ्यांना हा चित्रपट आत्मपरीक्षण करण्याची संधी देणार आहे यावर ठरेल.
अनेक चित्रपट येतात स्वप्नरंजन करून अल्पावधीत विस्मृतीत जातात, मात्र कायमच दखल घ्यावी अशी वास्तवावर बेतलेली कलाकृती दुर्मिळ असते. आर्टिकल 15 त्यापैकी एक आहे असं मला वाटतं.

सामाजिक प्रश्न हे वरवर वाटतात तेवढे साधे, सरळ, सरधोपट, एकसुरी आणि सोपे नसतात. म्हणूनच त्याचं सुलभीकरण टाळून त्याची गुंतागुंत समजून घ्यायची असते. ही समज यायला देखील आपल्या अनुभवांच्या कक्षा रुंदायला हव्यात. त्यासाठी "आर्टिकल 15" नक्कीच मदत करतो.

भारतीय संविधानातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी लोकनियुक्त सरकार आणि प्रशासनावर आहे. तसेच यावर नियमन करण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेला बहाल करण्यात आली आहे. मात्र, बारकाईने पाहिलं तर या मूल्यांचा लोकशिक्षणातून प्रचार, प्रसार होईल, नागरिकांच्या अंगी ही मूल्य रुजतील आणि तो त्यांच्या जगण्याचा भाग होईल म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्नच झालेले दिसत नाही. हे अनाहूतपणे , अजाणतेपणी घडलं आहे असं अजिबातच नाही. यामागे अनेक पातळ्यांवर हेतुपूर्वक उदासीनता दाखवण्यात आली आहे.

स्वाभाविकपणे ही उदासीनता सत्तेवर सर्वाधिक काळ राहिलेल्या घटकांची सर्वाधिक आहे. त्यांना ती टाळता येणार नाही आणि तसा ओरायत्न झाल्यास त्यांच्या हेतू आणि प्रामाणिकपणाची कठोर चिकित्सा व्हायला हवी.

पोलीस प्रशासन असेल किंवा प्रशासनाचे इतर विभाग, आपल्याकडील व्यवस्था संवैधानिक मूल्यांचा मागमूसही नसलेल्या माणसांनी भरल्या आहेत. त्या लोकांचं किमान काही शिक्षण व्हावं यासाठी देखील मागील काळात प्रयत्न झाले नसल्याचं प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे ज्यांच्याकडून समाजाचं नियमन होणार आहे किंवा किमान न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे तेथेच काळोख असलेला दिसतो. हा काळोख प्रभावीपणे "आर्टिकल 15" चित्रपटातून पाहायला मिळतो.

भारत हा एवढा मोठा आणि वैविध्याने नटलेला साचेबद्ध देश आहे की त्यातील प्रत्येक साचा/कप्पा वेगळ्याच जगात असतो. त्यांना आपल्या आजूबाजूला इतरही काही लोक जगतात, नव्हे जगण्याची धडपड आणि जीवघेणा संघर्ष करत मरतात याचंही भान राहत नाही. त्यातूनच मग आहे रे आणि नाही रे अशी विभागणी होते. भारतीय समाजात ही विभागणी टोकाच्या पातळीवर गेली आहे. प्रश्न केवळ ते स्वीकारण्याचा आहे, हे या चित्रपटातील अयान आणि निषाद या पात्रांवरून स्पष्ट होतं.

विशेष म्हणजे संपूर्ण चित्रपट पाहताना ही पात्रं अजिबातच काल्पनिक वाटत नाही. ही पात्रं आपल्या आजूबाजूला असल्याचा प्रत्यय अनेकांना येतो आणि त्यातून आत्मपरीक्षण करण्याची संधीही मिळते. स्वाभाविकपणे ही आत्मपरीक्षण करण्याची क्षमता त्यांचीच आहे ज्यांना स्वतःची चिकित्सा करत, वास्तव स्वीकारत काही बदल घडवायचे आहेत. त्यामुळे चित्रपट बघणारा कोणत्या सामाजिक वर्तुळात कोणत्या राजकीय कलाने वाढला आहे यानुसार या चित्रपटाचे विश्लेषण देखील नक्कीच बदलते.

सर्व काही "कुल" आहे असा विचार करणारा एक गट व्यवस्थेत निर्णायक ठिकाणी आहे. हे असण्यामागे शेकडो वर्षे मिळालेली सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विशेष संधी हे कारण आहे हे अगोदर मान्य करावं लागेल. हे मान्य केलं की मग व्यवस्था बदलाच्या आणि उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याचा सामूहिक प्रयत्नांमध्ये या विशेष संधी गटाचा किती महत्वाचा वाटा आहे हे वास्तव आपण स्वीकारू शकतो. मात्र, बदलाची लढाई देखील जातींमध्ये विभाजित झाली तर त्याचा परिणाम कसा मर्यादित होतो हेही आपल्याला या चित्रपटातून समजून घेता येते.

व्यवस्थेतील प्रत्येक निर्णायक गटाचं अधिक संवेदनशील होणं हे कोणत्याही श्रेयवादाच्या आणि नेतृत्व कुणी करायचं या वादापेक्षा अधिक महत्वाचं आहे हे चित्रपट पाहताना खूपदा जाणवतं. कारण एक साधा आणि तेवढाच स्पष्ट असणारा गुन्हेगारी स्वरूपाचा पुराव्यानिशी सिद्ध होणारा प्रश्न सोडवण्यासाठी देखील प्रयत्न करणारे हतबल होतात. हे फक्त चित्रपटासाठी मर्यादित नाही, तर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्यांचे हे दैनंदिन अनुभव आहेत. त्यामुळे हीच गुंतागुंत व्यवस्था परिवर्तनाच्या टप्प्यापर्यंत येऊपर्यंत अनेक हितसंबंधांचा संघर्ष होतो. तो टाळत बदलाची प्रक्रिया पुढे कशी रेटायची याचं कोणाकडेही "गोळीबंद" उत्तर नाही. त्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहे. म्हणूनच चित्रपट संपतो तरी भारतीय मुख्य प्रवाही चित्रपटाचं जे व्यवच्छेदक लक्षण आहे (गोड शेवट) ते या चित्रपटात दिसत नाही. हा चित्रपट अनेक प्रश्न अनुत्तरित सोडतो आणि वास्तविक समाजात देखील असेच प्रश्न अनुत्तरित असून त्यांच्या सोडवणुकीसाठी काम करण्याची गरज अधोरेखित करतो.

भारतीय समाजात असे अनेक जातीय, उपजातीय, धार्मिक आणि पंथीय कप्पे आहेत जेथे आजही आपल्या सारख्याच दुसऱ्या हाडामासाच्या माणसाचे माणूसपण नाकारले जाते. हे नाकारणे एवढे दैनंदिन असते, की त्यात काही चूक असल्याची भावनाही शिल्लकच राहत नाही. दुसरीकडे आधुनिक सुविधांचा उपभोक्ता वर्ग बहुतांशी गोष्टी आपल्या चर्चा कम गप्पा, टीव्हीवरील वृत्ताकन कम वाद किंवा वर्तमानपत्र यातूनच आपली सामाजिक समज बनवत असतो. त्यामुळे देशात जात शिल्लकच राहिली नाही, भेदभाव आमच्या पिढीत आहेच कुठे? माझ्या वर्तनातही कुठे जातीचा परिणाम जाणवतोय असा युक्तिवाद करतो.

वास्तवात मात्र, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या उच्च निचतेच्या नकळत संस्कारांनी आपलेही वर्तन त्याच परंपरेचे पाईक झाल्याचे हा वर्ग विसरण्याचा धोका वाढतो. ज्यावेळी आजूबाजूला सर्व आलबेल आहे आणि सर्व प्रश्न संपले आहे हे वाटायला लागते, तेव्हाच आपण जमिनीवरील वास्तवापासून बऱ्याच दूरवर प्रवास केला आहे हे समजून घेण्याची आवश्यकता असते. ही आवश्यकता आर्टिकल 15 चित्रपतील अयान हे पात्र करून देतं. विशेष म्हणजे हे पात्र अगदी निष्क्रिय असंही नाही. कारण ते भारताची स्वतःची समज तयार करताना किमान भारताचे माजी पंतप्रधान आणि स्वातंत्र्यसैनिक पंडित जवाहरलाल नेहरू यांचं "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" हे पुस्तक वाचत असतं. हे त्यातल्या त्यात एक आशेचा किरण वाटतं. भारताची समज तयार करण्यासाठी "बंच ऑफ थॉट्स"चा आग्रह होणाऱ्या काळात हेही थोडं नाहीच.

"आर्टिकल 15" हा चित्रपट अजिबातच कुणाही एकाला हिरो करणारा नाही किंवा कुणी एकजण (बाहेरचा अथवा छुप्या आवाजात दुसऱ्या जातीचा) येऊन पीडितांचा उद्धार करताना दाखवण्यात आलेलं आहे असाही नाही. मात्र, आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संविधानाची चौकट आणि नेतृत्व श्रेयवादाचा मुद्दा बाजूला ठेऊन सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता नक्कीच अधिक ठळक करतो. व्यवस्थेत प्रत्येकाला एक भूमिका असते, व्यवस्था हलवण्यासाठी या भूमिकेतील प्रत्येकाला संवेदनशीलपणे हालचाल करावी लागते तरच कुठे जाऊन काही समाधानकारक बदल होताना दिसतो. म्हणूनच जन्म कोणत्या जातीत झाला यावरून भेदभाव करणाऱ्यांबरोबर ज्या जातीचे प्रश्न फक्त त्या जातीनेच सोडवावे हा दृष्टिकोन प्रश्नांच्या गुंतागुंतीचं सुलभीकरण करणारा ठरतो.

हेतू, मूल्य आणि निष्ठा याच्या आधारावर प्रत्येकाची कठोर चिकित्सेची पूर्ण तरतूद करताना केवळ जात कोणती या मुद्द्यावर कोणी कोणत्या विषयावर बोलायचे, काम करायचे हे ठरवण्याचा दृष्टिकोन आपल्या नेणिवेतील जात वास्तवालाच उघडं करतो. हा मुद्दाही या निमित्ताने अधोरेखित झाला आहे. बदलाची प्रक्रिया निर्णय घेण्याची क्षमता असणाऱ्यांकडे केंद्रित असते, त्यामुळे अशा प्रत्येक घटकाशी सहकार्य किंवा संघर्ष अटळ असणार आहे हेही या चित्रपटात दिसते.

आपल्या आयुष्यात येणारा आपला जोडीदार वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करत असेल तर तो किती व्यापक पातळीवर आपले गृहीतके उद्ध्वस्त करतो आणि आपल्याला वास्तवाच्या जवळ नेतो याचाही प्रवास आर्टिकल 15 मध्ये पाहायला मिळतो. या चित्रपटात प्रामुख्याने दोन प्रेमकथा आहेत. एक विशेष संधी मिळालेल्या अयान आणि आदितीची, तर दुसरी जन्मापासूनच भेदभाव, नाकारलेपण आणि संघर्ष वाट्याला आलेल्या निषाद आणि गौरीची. या दोन्ही प्रेमकथा दोन वेगळ्या समूहांना आपल्या वाटतात. या प्रेमकथा केवळ प्रातिनिधिक आहेत हे समाजाचं पूर्ण वास्तव नाही हे मात्र यात लक्षात ठेवावं लागतं. मात्र, कुणी या प्रेमकथांच्या स्वरूपाबद्दल मुद्देसूद आक्षेप घेत असेल तर त्या आक्षेपांकडेही अधिक खुल्या दृष्टीने आणि अपूर्णत्वाला पूर्णत्व देण्याचा प्रयत्न या दृष्टिकोनातून पाहायला हवे.

चित्रपटात प्रत्येक घटनाक्रमात व्यवस्थेतील प्रत्येक घटक अन्याय होणाऱ्यांच्या बाजूने उभा राहून हिरो होऊ शकतो हेच दाखवले आहे. कुणा एका आदर्शवादी तरुणाने व्यवस्थेला साधा हादरा देखील बसत नाही, मात्र अनेक घटक एकत्र येऊन प्रयत्न करतात तेव्हा काही प्रमाणात का होईना पण बदलाची प्रक्रिया पुढे जाताना दिसते. कुणालाही हिरोची अपेक्षा नाही, पण हिरो येईल अशी वाट न पाहता स्वतः आपण पुढाकार घ्यावा हाच संदेश यातून पुढे येतो. त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, पोलीस अधिकारी, डॉक्टर, शासन आणि प्रशासन यांना जो सामुहिक प्रयत्न करावा लागतो तोही यात दिसतो.

ज्यावेळी सामाजिक, राजकीय व्यवस्था सर्वसामान्य माणसाला सरळ मार्गाने न्याय द्यायचं नाकारतात तेव्हा न्याय असा मागणी, मोर्चा आणि आंदोलनातून मिळत नाही तर हिसकावून घ्यावा लागतो याकडेच हे जनमत जातं. हा प्रवास पुढे सशस्त्र अथवा हिंसक लढ्याकडेही जातो. येथेच व्यवस्थेचे अपयश अधोरेखित होते. कारण हा प्रवास संवैधानिक आणि सनदशीर मार्गांनी फाट्यावर मारण्याचा एकत्रित परिणाम असतो. ही प्रक्रिया सुरू झाली की याविरोधात दमणशक्तीने युक्त सरकार नावाची संवैधानिक यंत्रणाही विरोधी आणि बंडखोर आवाजांना चिरडण्यास सज्ज होते.

विरोधाभास म्हणजे हीच सरकारी यंत्रणा प्रस्थापित समाजातील गुन्हेगारांवर कारवाई केल्यास "सामाजिक संतुलन" बिघडेल असा कांगावा करते. त्यामुळे व्यवस्थेच्या या जातनिहाय दुटप्पीपणाचाही या चित्रपटात पर्दाफाश होतो.

पोलीस, सैन्य, प्रशासकीय अधिकारी, न्यायाधीश यांना काही एक राजकीय मत असतं आणि तेही व्यापक परिणाम करतं हे अनेकदा राजकीय दृष्ट्या बरोबर राहण्याच्या प्रयत्नात दाखवणं टाळलं जातं. मात्र या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे यात पोलिसांचा जातनिहाय राजकीय कल कसा असतो याचीही झलक पाहायला मिळते. ती चूक बरोबर यावर मोठा वाद करता येईल, मात्र हे असं काही होतं हे मान्य करणं आवश्यक आहे. या निमित्ताने ती मान्यता दाखवणं महत्वाचं वाटतं.

सरकारी यंत्रणा आपल्याही नियंत्रणात असावी अशी इच्छा बाळगून असलेले सवर्ण धर्म पंडित राजकीय आखाड्यात उतरून दलित सवर्ण ऐक्याचा जयघोष करतात, मतांचं ध्रुवीकरण होतं आणि सत्तापालट होतो. मात्र प्रश्न तेच आणि तेथेच राहतात. हेही सामाजिक प्रश्नांची उकल करताना अधिक प्रगल्भ बनवतं.

या चित्रपटातील आणखी एक मोलाचा संदेश म्हणजे जेव्हा केव्हा आजूबाजूला सुरू असलेल्या प्रश्नांनी डोकं चक्रावून जाईल आणि त्यावर काय करावं हे सुचणं बंद होण्याच्या मार्गावर असेल तेव्हा आपल्याला संविधानाच्या मार्गावरून आणि संविधानाने मान्य केलेल्या मूल्यांनुसार काम करायचे आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि लक्षात आणून दिलं पाहिजे. जेव्हा प्रत्येकजण आपल्या जातीच्या तटबंदीत राहून इतरांना उच्च निचतेच्या नजरेने पाहू लागतो तेव्हा शेवटी संविधाचं त्या त्या परिस्थितीला relate करणारं पानं भिंतीवर लावावं लागतं. कारण अखेरची आशा आपल्यासाठी संविधानच आहे. त्यानंतरच्या शक्यता आज तरी दृष्टीआड आहेत.

चित्रपटाचा शेवट या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं सुलभीकरण करून एकच एक असं साचेबद्ध उत्तर अजिबात देत नाही. मात्र, व्यवस्थेला धडका देऊन माणूसपण हरवलेल्या आपल्या सारख्याच माणसांना जगण्याची उमेद देण्यासाठी माझा वाटा, माझी जबाबदारी काय हे अधोरेखित करतो.

प्रविण सिंधू

०८ ऑगस्ट २०१८

माझे "निर्माण"मधील अनुभव ...


"शोधग्राम" म्हणजे सामाजिक क्षेत्रातील एक खुली प्रयोगशाळा आहे, जेथे समाजातील विविध प्रश्नांची उकल करण्यासाठी सामुहिक पातळीवर विविध प्रयोग केले जातात. या प्रयोगांना जशी संशोधणात्मक कामाच्या पद्धतीची जोड आहे, तशीच सर्वसमावेशकतेची दृष्टीही आहे. मला वाटतं "निर्माण" हा शोधग्रामच्या सर्वात यशस्वी प्रयोगांमधील एक मैलाचा दगड आहे.

निर्माण तरुणाईला आश्वासक दिशा देत सामाजिक बदलाच्या व तेवढ्याच स्वतःलाही उन्नत करणाऱ्या प्रक्रियेत जबाबदारीने सहभागी करून घेते. हा सहभाग ‘स्व ते समाज” असा आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्याला यातून स्वतःला तर समजून घेता येतेच, सोबत आपल्या अवतीभवती असणाऱ्या समाजालाही  समजून घेता येते. हे समजून घेणं समोर असणाऱ्या भीषण परिस्थितीवर दया भावना, सहानुभूती अथवा कीव करण्यापर्यंत सीमित राहत नाही, तर त्या प्रश्नांच्या सोडवणुकीत मी काय भूमिका करू शकतो याची स्पष्टता देण्यापर्यंत असते.

माझा निर्माणमध्ये सहभागी होण्यापर्यंतचा प्रवास हा काहीसा बाळबोध सामाजिक काम ते परिणामकारक सामाजिक बदलाच्या प्रक्रियेतील सहभाग असा झाला. याची सुरुवात माझ्या गावात युवकांना घेऊन काम करण्यापासून झाली. पुढे मग विद्यार्थी दशेत विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये काम करत एका टप्प्यावर आता पुढे काय? या प्रश्नासह झाला. या टप्प्यावर माझ्यासमोर जसा कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा प्रश्न होता, तसाच पुढील कामाची निश्चित दिशा ठरवण्याचा आणि त्यातून उपजीविका व सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची ओढाताण कमी करण्याचाही होता. याच काळात भावनिक पातळीवर काहीसा एकटेपणाही जाणवत होता. यामागे प्रवाहापेक्षा वेगळा मार्ग निवडण्याची धडपड आणि त्यातून येणारी असुरक्षितता अशी कारणे होती. आजूबाजूला असणाऱ्या नातेवाईक, मित्र या वर्तुळात आपल्या सामाजिक विचारांना समजून घेऊ शकतील अशी खूप मोजकी माणसं होती. याच काळात मला निर्माणच्या सामाजिक बदलांच्या विचारांनी झपाटलेल्या समविचारी कुटुंबाचा भाग होण्याची संधी मिळाली.


निर्माणच्या वर्षभरातील एकूण ३ शिबिरांमध्ये मी स्वतःला अनेक पातळ्यांवर तपासू शकलो. अनेक ठिकाणी स्व चिकित्सा करण्याच्या मर्यादाही आल्या, तेथे निर्माणचे मित्र मदत करत गेले. ही मदत दोन स्वरूपाची होती. एक म्हणजे त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून काही insights (दृष्टिकोन) मिळत गेले आणि दुसरे माझ्या कृतींचे त्यांच्याकडून मूल्यमापनही झाले. या प्रक्रियेने मूल्यावर ठाम राहून, आदर्श समोर ठेवून देखील वास्तववादी जगता येते आणि नुसते जगता येत नाही तर सामाजिक बदलाच्या प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम करू शकू एवढ्या प्रभावीपणे जगता येते हे शिकवले.

निर्माणच्या १ वर्षातील सहभाग हा साधारणपणे ३ टप्प्यांमध्ये  (Camp) झाला. यामध्ये स्वतःची वर्तमान स्थिती अचूकपणे समजून घेत जगण्याच्या संकल्पनांमध्ये स्पष्टता आणता आली. तसेच मला माझ्यासमोरील नेमके प्रश्न काय आहेत यावर सखोल विचार करता आला. त्यामुळे सर्वप्रथम नेमके स्वतःवर कोठे कोठे काम करण्याची गरज आहे हे स्पष्ट झाले. आर्थिक परिस्थिती सुरुवातीपासून हालाखीची होती, त्यामुळे भविष्यात काम करत असताना आर्थिक बाजू सांभाळून हवे ते काम कसे करणार हा मोठा प्रश्न होता. कामाची निवड, मूल्ये, आर्थिक गरजा, जबाबदाऱ्या अशा संभ्रमात निर्माणच्या “माझी पैशांची गरज” या exercise ने खूप स्पष्टता दिली. आधी माझी नेमकी आर्थिक गरज किती आहे हे तेवढं स्पष्ट नव्हतं. निर्माणच्या या पहिल्या टप्प्यात हा प्रश्न निकाली निघाला. ही आर्थिक गरज ठरवताना त्यात Need आणि Greed हा फरकही करता आला. त्यामुळे अधांतरीची असुरक्षितता व अस्वस्थता कमी झाली आणि यापुढे प्रश्नांचा कशा सूक्ष्मपद्धतीने विचार करायचा याचेही प्रशिक्षण झाले.


अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आपल्या गरजा कोणत्या आणि इच्छा कोणत्या हा फरक स्पष्टपणे करू शकणे अत्यंत महत्वाचे असते. एकदा हा फरक कळाला की मग गरजा पूर्ण करून इच्छांच्या मागे न धावता अर्थपूर्ण आयुष्याचाही मार्ग धरता येतो. ‘अर्थ’पूर्ण यातील ‘अर्थ’मध्ये मोठ्या प्रमाणावर ‘Meaning’ आणि गरजेप्रमाणे ‘Money’ (Economic Stability for needs, not greeds) हाही आशय अंतर्भूत आहेच.

निर्माणमधून कौटुंबिक आणि सामाजिक दडपणाला हाताळण्याचेही प्रशिक्षण मिळते. ज्यांना मी माझे यश सांगू शकतो, मात्र अपयश सांगू शकत नाही ते माझे हितचिंतक असू शकत नाही ही थेट भूमिका त्यामधूनच येते. शोधग्रामच्या कामाची एक पद्धत आहे. ती म्हणजे नेमका प्रश्न काय हे शोधणे आणि एकदा प्रश्नाचे स्वरूप कळाले की मग त्याचे छोटछोटे भाग करून त्याच्या उत्तरावर काम करायचे. यामुळे प्रश्नाचं दडपणही राहत नाही आणि सूक्ष्मपणे कामही करता येते. कोणत्या कामाची गरज आहे हे ओळखणे, ज्यांचा प्रश्न आहे त्यांनाही प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठीच्या नियोजन प्रक्रियेत सहभागी करून घेणे आणि अंतिमतः त्या कामाचा फायदा व्यापक पातळीवर होईल यासाठी प्रयत्नरत राहणे ही शोधग्रामच्या व निर्माणच्याही कामाची पद्धत.

निर्माणचं एक महत्वाचं योगदान हेही आहे, की समाजातील मूलभूत गरजा पूर्ण असणाऱ्या आणि आता Need to Greed असा प्रवास करू पाहणाऱ्या एका मोठ्या व निर्णायक समूहाला संवेदनशील बनवणे. सोबतच त्यांना आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रश्नांबाबत आपलीही काहीतरी जबाबदारी आहे याची जाणीव होण्यास मदत करून  त्या प्रश्नांना भिडण्याची हिंमत देणे. आपली स्वतःची मूल्य व्यवस्था आपण क्षुल्लक कारणांसाठी मोडतो तसे होऊ नये म्हणून काय करायचे याचे उत्तर मागणारे निर्माणीदेखील मला याच ठिकाणी भेटले. आनंद नेमका कशात आहे? हे अगदी शास्त्रशुद्धपणे समजून सांगणारे आणि समजून घेणारे मित्रही निर्माणमधीलच. या सर्वांचाच सहवास खूप शिकवणारा होता आणि पुढेही राहीलच.

निर्माणमध्ये सहभागी होण्याअगोदर सामाजिक क्षेत्रात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या संघटनांशीही माझा जवळून संबंध आला. यामध्ये मूल्यांनी भारलेला आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी संघर्षाला नेहमी तयार असलेला काळही अनुभवला. हा अगदीच समृद्ध करणारा काळ होता. हे समृद्ध करणं चुकणे आणि शिकणे या प्रकारातील. यातील बहुतांशी कृती या प्रतिक्रियावादी स्वरूपाच्या राहिल्याचं आज मागे वळून पाहताना जाणवतं. प्रतिक्रिया देण्याची त्या त्या काळात प्रसंग आणि विषयानुसार गरज असतेच, मात्र यात माझी भूमिका काय असणार याबाबत आज अधिक स्पष्टता आली.

तारुण्याच्या उंबरठ्यावरच सामाजिक क्षेत्रात कामाला सुरुवात करणाऱ्या युवकांना एका टप्प्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यातून मग करियरची काळजी आणि पुढे जोडीदाराची निवड या महत्वाच्या निर्णय प्रक्रियेतून जावे लागते. बहुतांश वेळा करियर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यात सामाजिक कामातील आपला सहभाग हा फक्त दर्शकाचाच होऊन जातो. किंवा अगदी याच्या उलट होऊन सामाजिक कामातील सहभागामुळे ‘करियर आणि कुटुंब’ या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष होते. यातील ही दुसरी स्थिती जेथे करियर व कुटुंब दुर्लक्षित राहते या ठिकाणी नैराश्य येणे हाही एक न टाळता येणारा परिणाम आहे. याचा परिणाम मग आपल्या अवतीभवती असणाऱ्या माणसांवर आणि नव्याने सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींवरदेखील होतोच. तो परिणाम अंतिमतः हाती घेतलेल्या सामाजिक बदलाच्या कामावरदेखील होतो.

सामाजिक चळवळींमध्ये एक अनुभव असाही आहे की येथे वारंवार संघर्षाच्या भूमिकेत राहिल्याने एकतर कडवटपणाची सावली असणारा कठोरपणा येतो किंवा मग निराशाजनक संवेदनशीलपणा. या दोन्ही स्थितींना बाजूला करून संवेदनशील, सकारात्मक आणि परिणामकारक कृतिशीलपणा अंगी बाळगल्याचीही काही उदाहरणे सापडतात, मात्र ती अपवादासाठीच. अगदी कडवट कठोरपणा हा वारंवार संघर्ष करूनही शासनाच्या निगरगट्टपणातून न मिळालेला प्रतिसाद आणि प्रलंबित प्रश्न याच्या दाहकतेतून येतो, तर निराशाजनक संवेदनशीलपणा एवढा दीर्घकाळ काम करूनही अपेक्षित परिणाम होत नसल्याने किंवा दिसत नसल्याने येतो, असे मला वाटते. मात्र मधले अपवाद कसे तयार होतात, त्याची तयार होण्याची प्रक्रिया नेमकी काय आणि हे अपवाद हाच मुख्य प्रवाह होईल यासाठी काय करायचे या सर्वच आघाड्यांवर चळवळ अनुत्तरित होत आहे. निर्माणच्या माध्यमातून या अनुत्तरित प्रश्नांची उकल होण्याला सुरुवात झाली आहे, असे मला वाटते.

आपण जे काम हाती घेतलं आहे त्याची निश्चिती करणे, त्यासाठी सूक्ष्म नियोजन करणे, त्यानुसार कृती करणे, त्यानंतर अपेक्षित परिणाम झाला का हे तपासणे, जर परिणाम झाला नसेल तर केलेली कृती तपासून नव्या कृतींचा अवलंब करणे आणि एवढे करूनही अपेक्षित बदल/परिणाम साधता आला नाही तर आपण घेतलेल्या मूळ प्रश्नांच्याच स्वरूपाची किंवा आपल्या अपेक्षांची चिकित्सा करणे ही शोधग्रामसह निर्माणच्या कामाची पद्धत. यामुळे आपण काम करताना नेहमीच बदलांना खुले राहतो आणि सुधारणा करत राहतो. हाच यातील कामाच्या यशाचा गाभा आहे असे मला वाटते. हा दृष्टिकोन जर इतर सामाजिक क्षेत्रातील संस्था संघटनांनी देखील अवलंबला तर खूप मोठं काम उभं राहिलं असा विश्वास वाटतो.

“नायना” आणि “अम्मा” नावाचं खुलं विद्यापीठ -


गडचिरोली येथील शोधग्रामच्या परिसरात मुळातच संशोधक वृत्ती असलेले “नायना” म्हणजेच डॉ. अभय बंग आणि प्रचंड शिस्तबद्धपणे हाती घेतलेले काम पूर्ण करणाऱ्या “अम्मा” म्हणजे डॉ. राणी बंग हे निर्माणींसाठी एक खुलं विद्यापीठ आहे. माझ्या सामाजिक कामातील दिशा ठरवताना विचारांना अधिक स्पष्टता यावी यासाठी नायनांनी सांगितलेल्या ३ कसोट्या खुपच प्रभावी आहेत. आपण कोणतंही काम करत असू तर या तीन कसोट्यांनी तपासल्यास आपल्या अनेक शंका येथेच संपतात. या कसोट्या खालीलप्रमाणे,

१. MK - म्हणजे काय?
२. KM - कसं मोजणार?
३. KS - कशासाठी ?

कामातून (कृतीतून) माणसाला स्वतःला ओळखता येते, भ्रम गळतात आणि वास्तव दिसते. बोलण्यातून ते होत नाही. बोलण्यात नसलेलं सांगणं असतं, जे खोटं असतं, हे नायनांचं अनुभवांती झालेलं मत खूप पटतं. नायनांनी सांगितलेले निर्माणचे वेगळेपण व मी स्वतः घेतलेला अनुभव म्हणजे या प्रक्रियेत स्वतःचा होणारा दुहेरी प्रवास. यात एकीकडे आपण अहंकाराच्या बाबतीत “मी” कडून “विश्व”कडे जातो तर दुसरीकडे जबाबदारीच्या पातळीवर व्यक्ती “आपण”च्या अवस्थेतून “मी”कडे जातो. याच अवस्थेत मग मी काय करणार हे ठरवत कृतीला सुरुवात होते आणि त्याची जबाबदारी मी स्वीकारतो हेच या प्रक्रियेचं यश. नायना स्व च्या शोधाबाबत सांगतात, “या वयात सर्वच तरुण स्व चा शोध घेतात. स्व हा प्रकाशाचा किरण असतो, तो दिसत नाही पण जेव्हा तो एखाद्या वास्तविक प्रश्नाला भिडतो, तेव्हा “स्व” चा शोध लागतो. जे समजण्यासाठी विचारांसोबत कृती हाच एकमेव मार्ग असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
अम्मांनी सामाजिक कामातील संघर्षमय कसोटीच्या क्षणांची हाताळणी कशी करावी याचे स्वानुभवातून आलेले शहाणपण दिले हे खूप उपयोगी ठरणारे आहे. त्याची उपयुक्तता येणाऱ्या काळात प्रकर्षाने जाणवणार आहे. सत्यासाठी भांडण्याची शिकवण अम्मांना त्यांच्या आई वडिलांकडूनच मिळाली आहे. त्यामुळे सत्याचा स्वीकार तर करायचा पण अन्यायही होऊ द्यायचा नाही हा त्यांचा स्वभाव बनला. माणूस फक्त चांगला किंवा वाईट नसतो, तर तो चांगला + वाईट असतो. स्वार्थाच्या क्षणी माणसातून वाईटपणा बाहेर येतो, हे त्यांचे अनुभवातून आलेले निरीक्षण. अम्मांना मृत्यूचं अजिबात भय नाही. त्यांच्यामते भीती ही एक काल्पनिक बाब आहे. आपण विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहायला हवे, अगदी मृत्यूच्या क्षणीदेखील ठाम रहावे असेच त्या सांगतात. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जेव्हा आपला सर्व जीवनपट डोळ्यासमोर उभा राहील तेव्हा पश्चाताप वाटायला नको एवढीच त्यांची इच्छा आहे. तरुणांना खूप मोठा अवकाश उपलब्ध असून खूप काम करा असे सांगताना अम्मा सत्याशी आणि मुळाशी तडजोड न करण्याचेही बजावतात. हे सर्वच मला अधिक प्रगल्भ बनवणारे होते.
आपल्यापैकी प्रत्येकजण गांधी होऊ शकतोे हा विश्वास देताना नायनांनी सहभागी निर्माणींना “महाराष्ट्र तुमची (निर्माणींची) वाट बघणार आहे” हे सांगत जबाबदारीची जी जाणीव करून दिली होती. ती फार बोलकी आहे. त्या दृष्टिकोनातून प्रवास सुरु आहे. पाहुयात कसा आणि कोणत्या टप्प्यापर्यंत हा प्रवास जातोय.


प्रविण
०७ ऑगस्ट २०१८

२४ मे २०१८

आणखी जीव घेण्यास "राझी" नसलेली "सेहमत" ...



आपला देश, आपल्या देशातील माणसे आणि त्या माणसांसाठीची देश म्हणून काही प्रतीके यांचे त्या त्या देशातील माणसाच्या आयुष्यात काय महत्व आहे हे जर कुणाला विचारले तर कदाचित सांगता येणार नाही. पण त्याबद्दलची भावना मात्र प्रबळ असते आणि तेवढीच सार्वत्रिकही असते. याच भावनेतून मग आपल्या देशाप्रती अभिमान/प्रेम व्यक्त करण्यासाठी गाणी तयार होतात आणि ती गाणी काही कालावधीसाठी का होईना पण आपल्यामध्ये प्रचंड उत्साह भरतात.


प्रत्येक देशाला अशी गाणी असतात आणि प्रत्येक देशातील माणसाचे आपल्या देशावर असेच निस्सीम प्रेम असते. मग तो देश भारत असो, पाकिस्तान असो की आणखी कोणता.  #राझी या चित्रपटात देखील असेच एक गाणे आहे. ‘ए वतन मेरे वतन आबाद रहे तू, मै जहाँ रहू जहाँ में याद रहे तू ...’ राझीमधील या गाण्याचे एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे हे गाणे एकच आहे, पण ते एकच गाणे म्हणणारी माणसे राष्ट्र निर्मितीपासूनच शत्रुत्व घेऊन जन्माला येणाऱ्या भारत आणि पाकिस्तानचे नागरिक आहेत. या दोन्ही देशांची माणसे हे गाणे एकाच वेळी अत्यंत मनापासून आपल्याआपल्या देशासाठी म्हणत आहेत. त्यात आपल्या देशाप्रती प्रेम आहे, पण म्हणून दुसऱ्या देशाप्रती कोठेही द्वेष नाही. जेथे प्रेम आहे तेथे द्वेष कसा येईल? असाच काहीसा प्रश्नवजा संदेश त्यातून मिळतो. त्यामुळे त्या तत्कालिक काही क्षणांसाठी तरी तेथे प्रेमाची निखळ भावना व्यक्त होते. त्यावेळी काही क्षण मनात पटकन विचार येऊन जातो की मग या दोन देशांमध्येही असेच प्रेम तयार झाले तर ? ही खुपच सुखावणारी शक्यता आहे ना? हो नक्कीच आहे.


या गाण्याचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याच्या शेवटी लहान मुलाच्या आवाजात एका प्रार्थनेचाही अंश आहे. हीच प्रार्थना भारताला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर संपूर्ण देशात म्हटली जायची. याची आठवण स्वतः गुलजार यांनीच एका मुलाखतीत सांगितली. त्यावेळी गुलजार यांनी हेही आवर्जून सांगितले की या प्रार्थनेचे आणि “सारे जहाँ से अच्छा …” या गीताचे लेखक एकच आहेत आणि ते पाकिस्तानी होते. त्याचं नाव #इक्बाल आणि त्यांची ती प्रार्थना,


लब पे आती है दुआ बनके तमन्ना मेरी
जिंदगी शम्मा की सूरत हो खुदाया मेरी
दूर दुनीया का मेरे दम अन्धेरा हईओ जाये
हर जगह मेरे चमकने से उजाला हो जाये
हो मेरे दम से यूही मेरे वतन की जीनत
जिस तरह फूल से होती है चमन की जीनत
जिंदगी हो मेरी परवाने की सूरत या रब
इल्म की शम्मा से हो मुझको मोहब्बत या रब
हो मेरा काम गरीबो की हिमायत करना
दर्द मंदों से ज़ईफों से मोहब्बत करना
मेरे अल्लाह बुराई से बचाना मुझको
नेक जो राह हो उस राह पे चलाना मुझको


सेहमत आणि इकबाल यांच्या नात्याचा प्रवास तर खूपच संवेदनशील आहे. या नात्यात परस्पर सहमती आणि आदर हे खूप महत्वाचे पैलू दिसतात. लग्नानंतर पत्नीला समजून घेण्यासाठी आणि पत्नीला देखील पती समजून घेता यावा यासाठी ते जो वेळ घेतात तो खूपच प्रगल्भता दर्शवणारा भाग आहे. ही प्रगल्भता व्यक्तीनुसार २ देशांमध्ये देखील असेल तर … खरतर हा जर तरचाच प्रश्न आहे, पण चांगल्या शक्यतांबद्दल विचार करायला हरकत नाही. असो.


सेहमत ही तशी रक्त बघितले तरि चक्कर येणारी मुलगी. अगदी छोट्याश्या खारीला वाचवताना रस्त्यात असल्याचेही भान नसणाऱ्या सेहमतला पुढे देशातील समस्यांबद्दल वडिलांकडून माहिती दिली जाते आणि वडिलांच्या जागी हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानमध्ये लग्न करून पाठवले जाते. येथे एक प्रश्न मनात येतो तो म्हणजे सेहमतचे लग्न एवढ्या सहजासहजी कसे होते. दोन्ही देशात एकीकडे तणाव वाढत असताना हे होऊच कसे शकते असेही वाटू शकते आणि ते वाटायलाही हवे. याचे उत्तर आहे पाकिस्तानी सैन्याचा तो अधिकारी आणि हेरगिरी करणारा तो "भारतीय काश्मिरी मुस्लिम" यांच्यातील फाळणीपूर्वीचे नाते. बांग्लादेशची फाळणी होऊपर्यंत अशापद्धतीने नात्यांमध्ये काहीसा ओलावा शिल्लक होता का ? असा प्रश्न यानिमित्ताने पडतो. त्याचे उत्तरही होकारार्थी येते. हा चित्रपट घटीत घटनांवरच बेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारल्याचेही जाणवते ते याचमुळे कदाचित.


आपण कोठे राहतो यावर आपण घटनांकडे कसे पाहतो हे ठरत असते. त्याचा प्रत्यय या चित्रपटात येतो. म्हणजे दोन्ही देशांना वाटत असते की आपला देश सुरक्षित रहावा. आपल्या देशाच्या रक्षणाची जबाबदारी आपली आहे आणि महत्वाचे म्हणजे आमच्या अंतर्गत बाबींमध्ये बाहेरच्या देशांनी हस्तक्षेप करू नये. मग दोघांनाही असे वाटत असताना अडचण कुणाची आहे ? आणि का ? या दोन देशांमध्ये तणाव का निर्माण होतो ? यावर विचार करण्याची जबाबदारी चित्रपट दर्शकांवर सोपवतो.


सेहमत जम्मू काश्मीरमधील ‘भारतीय मुस्लीम मुलगी’. मला हा उल्लेख खूप महत्त्वाचा वाटतो. तो अशासाठी की सद्यस्थितीत मुस्लिमांबाबत एका रणनितीअंतर्गत देशविरोधी असल्याचे प्रचारतंत्र राबवले जात आहे आणि ती मुस्लीम व्यक्ती जम्मू काश्मीरमधील असेल तर मग त्याच्याविषयी आणखी जास्त संशयास्पद वातावरण निर्माण केले जाते. चित्रपट ज्या ‘कॉलिंग सेहमत’ या पुस्तकावर आधारित आहे, ते पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाने याबाबतचा एक प्रश्न जम्मू काश्मीरच्या एका वरिष्ठ नेत्याला विचारला असता, त्याचे उत्तर देखील अंतर्मुख करायला भाग पाडते. त्या नेत्याने म्हटले होते, की ‘आपको एक सेहमत चाहिये, हजारो सेहमत है. सिर्फ उन्हे अपनाने की जरूरत हैं.’ जम्मू काश्मीरचा प्रश्नाचा विचार तेथील स्थानिक लोक वगळता उर्वरित देश कसा करत असेल तर जम्मू काश्मीर भारताची शान आहे आणि तेथील जमीनीचा इंच न इंच भाग भारताचा आहे, अशी. पण या सर्व हेव्यादाव्यांमध्ये तेथे राहणारे सर्व जम्मू आणि काश्मीरमधील माणसे आमची आहेत की नाही ? असा मुलभूत प्रश्नच हरवून जातो. या प्रश्नाला भिडण्याचीही गरज या निमित्ताने जाणवते.


बांग्लादेश फाळणी या विषयाला घेऊन सुरू झालेला हा चित्रपट शेवटपर्यंत आपल्याला देशभक्तीच्या ओतप्रोत भावनांमधून घेऊन जातो, काही ठिकाणी 'सेहमत'ची (आलिया भट) होणारी भावनिक ओढाताण, घुसमट देखील प्रकर्षाने जाणवते. मात्र या सर्व प्रवासातून अंतिमतः काय होते तर युद्ध (जंग). मग युद्धात काय होते ? याचा काहीसा अनुभव घेणारी सेहमत उद्वेगाने काही प्रश्न उपस्थित करते. सेहमतने उपस्थित केलेले हे प्रश्न आणि त्या प्रश्नांना भारतीय गुप्तहेर संस्थेतील त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेले उत्तर खूप महत्वाचे आहे आणि तेच सांगण्यासाठी अगोदरचा हा सर्व रोमांचक प्रवास अनुभवला आहे का असेही वाटते. तो संवाद आहे,


"वतन के आगे कुछ नही, खुद भी नही प्यार भी नही!
मैने अपना जमीर, जान, जिंदगी आपके लिये दि और आपने ? …
जंग में ना तुम्हारी कोई किमत होती है, ना मेरी
ना रिश्तो की किमत, ना जान की
जंग मे सिर्फ जंग होती है, और कई मासूमोंकी जाने जाती है."


यावेळी सेहमत खूप ठाम भूमिका घेते व इतर गुप्तहेरांसारखं तिला निर्दयी-पाशवी व्हायचे नाही आणि हे सर्व सोडून घरी जायचे आहे असे सांगतेे. भारतात आल्यावर देखील तिची आई तिला ती गरोदर असल्याचे सांगते, त्यावेळी ती क्षणाचाही वेळ न लावता आता आपण कोणाचाही जीव घेणार नसल्याचे स्पष्ट करते. हा क्षण अंगावर काटा आणणारा आहे. पोटात शत्रू समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या नवऱ्यापासून होणारे बाळ असूनही त्याचा गर्भपात करायला नकार देत, सेहमत त्याला वाढवण्याचा निर्णय घेते आणि हाच मुलगा भारतीय सैन्यात दाखल होतो. तो चित्रपटात जहाजावर काम करत असताना दाखवला देखील आहे.


आशयाच्या पातळीवर चित्रपटाच्या सर्वात शेवटी कानावर पडलेले हे संवाद चित्रपटाचा गाभा आहे, असे मला वाटते. हा चित्रपट "Between the line" असे खूप काही सांगून जातो. आपल्यालाही आपल्या अनुभव विश्वानुसार या चित्रपटातील संवादाला घेऊन वर्तमानात काही सापडते आणि आपण त्याचा विचार करायला सुरुवात करतो.
आपल्याकडे  प्रेमाची आणि द्वेषाची सर्वच बीजे इतिहासात असल्याचे माझे व्यक्तीगत मत आहे. इतिहासातून पुढच्या पिढ्यांना घडवत असताना पुर्वजांकडून एकमेकांच्या कडवट आठवणींचा ठेवा दिला जातो,  की एकमेकांवर प्रेम करणारे काही सामायिक दुवे त्या पिढ्यांमध्ये झिरपवल्या जातात त्याप्रमाणे त्या देशातील जनमानसाचे मन घडत असते. हेच पुढे निर्णायक ठरते, याचा प्रत्यय आपल्यालाही येत आहेच.


राष्ट्रवादाच्या प्रवासात कोलमडणारी नाती आणि उद्ध्वस्त होणारे कुटुंब हा या प्रवासातील आणखी एक टप्पा. या टप्प्यावर मन पिळवटून काढणारे अनेक प्रसंग अनुभवायला मिळतात. हे सर्वच प्रसंग देश आणि धर्माच्या चौकटी ओलांडून आपल्यातील माणूसपणाला साद घालतात. जेव्हा आपल्यासमोर आपले माणुसपण जपायचे की राष्ट्रवाद असा प्रश्न येईल, तेव्हा रविंद्रनाथ टागोर यांचा राष्ट्रवादातील विचार देखील आठवतो.  रविंद्रनाथ टोगोर राष्ट्रवादाविषयी आपले विचार मांडताना आपल्या १९१७ च्या ‘नॅशनॅलिझम इन इंडिया’ नावाच्या निबंधात म्हणतात, ‘‘राष्ट्रवाद म्हणजे जनतेच्या स्वार्थाचे असे संघटीत रूप की ज्यामध्ये मानवता तसेच आपलेपणा किचिंतही शिल्लक राहात नाही. दुर्बल आणि असंघटीत शेजारी राज्यांवर अधिकार मिळवण्याचे प्रयत्न हा राष्ट्रवादाचा स्वाभाविक परिणाम आहे. ह्यातूनच निर्माण झालेला साम्राज्यवाद, अखेर मानवतेचा खुनी बनतो. राष्ट्राच्या बलविकासावर काही नियंत्रण शक्य नसते, त्याच्या विस्ताराला काही सीमा नसते. राष्ट्रवादाच्या अनियंत्रित शक्तीमध्येच मानवतेच्या विनाशाचे बीज आहे.’’ संकुचित राष्ट्रवादाच्या विरोधात ते पुढे लिहितात, “राष्ट्रवादातून जन्मणारी संकुचितता हा मानवाचे नैसर्गिक स्वातंत्र्य आणि आध्यात्मिक विकास यांच्या रस्त्यावरील अडथळा आहे.” ते राष्ट्रवादाला युद्धपिपासू वृ्त्तीला उत्तेजन देणारा आणि समाजविरोधी समजतात, कारण राष्ट्रवादाच्या नावांवर होणारा शासनशक्तीचा अनियंत्रित उपयोग अनेक अपराधांना जन्म घालतो.


चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा, संवाद, अभिनय सर्वच अप्रतिम. आलियाचा अभिनय तर प्रचंड ताकदीचा वाटला. ही ताकद चेहऱ्यावरील expression ची वाटली. तिच्या या expression मध्ये 'निरागसपणा' आणि ‘घुसमट’ हे भाव विशेष नोंद करून गेले. गाणी, संगीत तर ऐकत राहावं असंच आहे.


हा चित्रपट ज्या पुस्तकावर बेतला आहे त्याच्या लेखकांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये काही गोष्टी नमूद केल्या आहेत. त्यात त्यांनी हेही नमूद केले की सेहमत भारतात आली तेव्हा प्रचंड तणावात होती व तिने जे काही केले होते त्याबद्दल तिला अजिबात आनंद वाटला नव्हता. सेहमत भारतात जेथे रहात होती, तेथे ती का राहते असे विचारले तर तिने पाकिस्तानमध्ये ज्या अब्दुलला मारले तो येथेच राहत होता, असे सांगितले. सेहमत आणि तिच्या मुलांमध्ये देखील घडामोडींचा काय परिणाम झाला हे सांगताना त्यांच्यातील संबंध काहीसे दुरावल्याचेही लेखकांनी नोंदवले आहे. यातून हा सर्वच प्रवास किती गुंतागुंतीचा होता हे कळते. लेखकांनी हे देखील सांगितले की सेहमतकडून त्यांना गुरुनानक यांच्याबद्दल देखील खूप माहिती मिळाली. ते सेहमतचे वर्णन करताना म्हणतात, “Kashmiri Muslim Women Fight For India”, यात बरंच काही येते आणि ते समजून घेता आले तर खूप सकारात्मक परिस्थिती तयार होईल.


(नोंद - सेहमतचा मृत्यू जून २०१८ ला झाला आहे.)
#Raazi #राझी

१३ एप्रिल २०१८

अपर्णा रामतीर्थकर यांची व्हायरल पोस्ट आणि त्यावरील आक्षेप



आईने मुलीला सासरी जाताना दिलेले सल्ले वजा उपदेश असलेली पोस्ट ही अपर्णा रामतीर्थकर यांच्या भाषणाने प्रभावित आहे. स्त्री शिक्षणाचा जोरदार विरोध करणाऱ्या या कथित समाजसेविकांचा विरोधाभास हा की त्यांनी स्वतः वकिलीचे शिक्षण घेतले आहेत आणि तरिही मुलींच्या शिक्षणाला विरोध करुन त्या स्वतःतीलच दांभिकपणा दाखवत आहेत.

या पोस्टची सुरुवात ज्या पद्धतीने केली आहे त्यामुळे अनेकदा पीडित भूमिकेत असलेल्या प्रत्येकाला पोस्टची सुरुवात वाचून तो विचार पटतो. कारण प्रत्येकाचे स्वतःचे म्हणून काही अनुभव असू शकतात, मात्र कधी कधी अशा व्यक्तींना आपले अनुभव हे सार्वत्रिक असल्याचाही गैरसमज होतो. त्यातूनच मग अशा मांडणीवर विश्वास ठेवायला सुरुवात होते. खरंतर प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेमाने, समजूतदारपणे वागावे हे शाश्वत आणि वैश्विक मूल्य आहे, पण जेव्हा हे वागणं फक्त महिलांवर बंधनकारक करत पुरुषांना यातून सूट दिली जाते, तेव्हा त्यातून सोयीस्करपणे आणि कदाचित नियोजनबद्ध पद्धतीने पुरुषप्रधान संस्कृतीला पाठबळ देण्याचा प्रयत्न होतो.
सध्या पालक आणि पाल्य या नात्यात पिढीतील अंतर आणि त्यांच्या अनुभव विश्वांमध्ये गतीने होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभुमीवर एक विचार (मार्गदर्शक दिशा) सांगितला जातो. तो म्हणजे पाल्यांचे दिशादर्शक (मार्गदर्शक) व्हा, त्यांचे नियंत्रक होऊ नका. या तत्वाचा विचार केला की मग साचेबद्ध उत्तर न देता त्यावर आपला दृष्टिकोन शांतपणे आणि संयमाने ठेवा आणि अट्टाहास न करता तो दृष्टीकोन स्वीकारायचा की नाही हा निर्णय समोरच्या व्यक्तीला घेऊ द्यात हा दृष्टिकोन मिळतो. मात्र या पोस्टमध्ये अपर्णा रामतिर्थकर अगदी साचेबद्ध आणि सर्व आजारांचा रामबाण उपाय अशा जाहिराती थाटात सुनेने (स्त्रीने) कसे वागावे असा उपदेश देत आहेत. जे आक्षेपार्ह आणि चुकीचे आहे, असे मला वाटते. त्यामुळे अशा स्वरूपाच्या साचेबद्ध आणि सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच सांगणाऱ्या लिंगभेदी पोस्टवर गांभीर्याने विचार करुन या पोस्ट सकारण नाकारायला हव्यात.

मुलीला तिचं घर कोणतं हा उपदेश देत या पोस्टची सुरुवात होते. हे सांगताना लिहिणाऱ्याच्या विचारप्रणालीत पुरुषप्रधानतेची बीजं किती खोलवर रुजली आहेत याचं स्पष्टपणे दर्शन होतं. कोणत्याही माणसाला (स्त्री-पुरुष) आपले लहानपण जेथे गेले त्या जागेशी काही जैविक व भावनिक नाते असते. ते सोडून जाण्याची भावना काय असते हे कदाचित आपल्याला विस्थापितांच्या अनुभवातूनही समजू शकेल. पण आयुष्याच्या एक महत्वाच्या टप्प्यावर अशापद्धतीने स्वतःचं मूळ सोडून दुसऱ्या ठिकाणी जाताना मानसिकपातळीवर काय घालमेल होते हे देखील समजून घेणं आवश्यक ठरते. ज्यावेळी मुलींना आपण जेथे लहानाचे मोठे झालो, ज्या माणसांनी आपल्याला जीवापाड प्रेम करत मोठे केले असे आपले माहेरचे ठिकाण आपले नाहीच असे सांगण्याचा प्रयत्न होतो तेव्हा हा फारच क्रूर आणि स्वार्थीपणाचा मानवी व्यवहार म्हणावा लागेल. यातील स्वार्थीपणा हा पुरुषसत्ताक व्यवस्थेचे समर्थन करणारा व त्याला अधिक बळकटी देणारा असतो. 

पुरुषप्रधान संस्कृतीत मुलीने स्वतःचं घर सोडून सासरी जाणे हे अपेक्षित असते आणि त्याबद्दल कुणालाही काहीही घेणेदेणे नसते, त्यामुळे संवेदनशीलपणे ते संक्रमण समजून घेण्याचीही तसदी कोणाकडून दाखवली जात नाही. त्यामुळे  सासर हेच यापुढे तुझे स्वतःचे घर आहे आणि यापुढे तु आमच्या घरी पाहुणी म्हणुन आहेस, त्यामुळे यापुढे आमच्याशी वागताना पाहुण्यासारखीच वाग, असे सांगणे. तसेच यापुढे जाऊन आता लग्न होऊन ज्या घरी जाते आहेस तेथेच तुझं मरण झालं पाहिजे. जगली तरी सासरी आणि मेलीस तरी सासरी हा जाणीवपूर्वक संस्कार (propoganda) रुजवला जातो. याला माझा व्यक्तिगत विरोध आहे.

मालिका बघण्याबाबत माझे व्यक्तिगत काही आक्षेप आहेत, पण हे आक्षेप रामतीर्थकर यांच्या सारख्या एकेरी हाक मारू नये छाप अर्थहीन आक्षेपांसारखे नाही. कारण अनेकवचनी हाक मारल्यावर अगदी माणुसपणाचे सर्व संस्कार होतात हा माझा भ्रम नाही आणि ज्यांचा आहे त्यांनी तो दुरुस्त करावा असेच माझे स्पष्ट मत आहे. त्याचं कारण हा एकेरीपणा एकमेकांच्या विश्वासातून आणि मैत्रीपूर्ण नात्यातून येतो. आणि हा टप्पा कथित सन्मानाच्या नाटकी वागण्यापेक्षा खूप महत्त्वाचा आहे. जेथे प्रत्येकजण वयाचे दडपण न घेता व्यक्त होतो. त्या व्यक्त होण्यात प्रचंड प्रेम आणि आदर असतो, जो नाटकी अथवा सामाजिक दाबावातून न येता मनातून आलेला असतो. याचं उदाहरण द्यायचं ठरलं तर तिर्थकरांना पटेल असं आईचं उदाहरण आहेच. त्यांनी त्यावर विचार करावाच.

जॉब-करीअर या महत्वाच्या गोष्टींना फालतु म्हणणे म्हणजे टोकच झाले. त्यापुढे जाऊन पैसा कमविण्यासाठी घराचा उंबरठा न ओलांडण्याचा सल्ला म्हणजे वास्तव नाकारत स्वतःच्याच कोशात राहणे आहे. आज पैसे ही आयुष्यातील सर्वस्व नसली तरी जगण्यासाठी (महिलांसाठी तर सन्मानाने जगण्यासाठी) अत्यावश्यक बाब झाली आहे. त्यामुळे नोकरी, पैसे याचं किमान महत्वही नाकारणे हा शुद्ध मूर्खपणा आहे.
तिर्थकरांचं महत्वाचं वेगळेपण म्हणजे त्या ज्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात त्यातून त्या अजूनही बाहेर पडलेल्या नाहीत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांना त्यांच्या नवऱ्याने कधीही प्रेमाने बाहेर फिरायला जायचे का असे विचारले नाही. त्यामुळे तसे विचारुच नये असा आट्टाहास त्या करतात. दैनंदिन जगण्यात काही नाविन्य शोधत जगण्याचा आनंद घेण्याशी या वकिल बाईंचा दुरान्वये देखील संबंध न आल्याने हे असे होत असावे असे मला वाटते.

'लग्नाच्या वरातीत भर रस्त्यावर चारचौघात नाचु नकोस, त्यामुळे माहेरच्या नावाला काळिमा लागेल', हा तर गमतीशीरच सल्ला. हा सल्ला देण्यामागे नाचणे (नृत्य) वाईट असते, त्यात चारचौघात नाचणे तर जास्त वाईट अशी काही गृहीतके असल्याचे लक्षात येते आणि त्यांची नृत्याविषयीची संकुचित समज व दृष्टिकोनही कळतो. पण यासर्वात त्या दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या आपल्या वंशाच्या दिव्याबद्दल मात्र काहीही आक्षेप घेत नाही. दुसरीकडे घरातल्याच लग्नाच्या वेळी महिलांनी गाण्यावर नाचणे म्हणजे यांना माहेरच्या नावाला काळिमा फासणे वाटते. काय काय केल्यावर आईच्या, वडिलांच्या व माहेरच्या नावाला काळिमा फासला जातो याबद्दलची तिर्थकरांची यादी तशी मोठी आहे. एकूणच संस्कृती रक्षण आणि कुटुंब बचावच्या बेगडी कामात त्यांना या यादीचा काहीसा फायदा होईलही, पण उत्क्रांतीच्या टप्प्यावर त्यांची ही यादी त्यांच्यातील उत्क्रांतीचा अभावच अधोरेखित करते.

"घराबाहेर पडताना लेगिन, जिन्स, टी-शर्ट असे कपडे वापरणं बंद कर व तसे कपडे घालुन फिरण्याचा अट्टाहास करु नकोस", असाही सल्ला त्या देतात. त्यांच्या मते यामुळेही कदाचित संस्कृती व कुटुंब धोक्यात आले असावे , त्यामुळे अशा सल्ल्यांवर येणारी पिढी हसण्यापलिकडे काही करेल असे वाटत नाही.

तिर्थकर यांच्या म्हणण्यानुसार अशा गोष्टी जर प्रत्येक आईने आपापल्या मुलीला मनापासून शिकवायला सुरुवात केली, तर कोर्टात व पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या पती-पत्नींमधील खटल्यांची व तक्रारींची संख्या कमी होईल. एकूणच त्यांच्या मांडणीचा हा गाभा. म्हणजे  यातही त्यांचे गृहीतक हेच की पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारी आणि न्यायालयातील खटले स्त्रियांच्या चुकांचा परिपाक आहे. पण त्या यावेळी एवढही समजून घेण्याची तयारी ठेवत नाही की आपल्या समाजात आजही सासरी होणाऱ्या अत्याचाराला सहनच करायचे असते या त्यांच्या सारख्या मानसिकतेच्या स्त्रियांची संख्या प्रचंड आहे. कोणतीही स्त्री अत्याचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर नाईलाजाने पोलीस ठाण्याचा पर्याय निवडते. अनेक स्त्रीयातर हा पर्याय देखील निवडत नाही. अशा स्थितीत अत्याचार करणाऱ्यांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्यांऐवजी पीडितांनाच नसलेले सल्ले देणे म्हणजे त्यांच्या भाषेत माणूसपणाच्या नावावर कलंक आहे. हे असं करणं म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचा इतिहास व वर्तमान हेतुपुरस्कर विसरायचा आणि काहीतरी वेगळाच सांगत दिशाभूल करण्याचा हा प्रकार होय.

तिर्थकरांना नाते परस्पर समजुतीने समृद्ध करण्याच्या दीर्घ प्रक्रियेशी काही देणे नसल्यासारखे फक्त एकाने तडजोड करावी अशीच त्यांची मांडणी आहे. त्यांच्या भाषणांना   मिळणारा प्रतिसाद या व्यवस्थेच्या लाभार्त्यांकडून व काहीसा स्वतःचे ठोस मत बनवू न शकलेल्या काठावर बसलेल्यांकडून येत आहे. मी जेव्हा एकदा त्यांचे भाषण ऐकायला गेलो होतो, त्यावेळी मी अनुभवले की अनेक पुरुष आपल्या घरातील मुलींना व महिलांना अगदी आग्रहाने (जबरदस्तीने) घेऊन आलेआईने मुलीला सासरी जाताना दिलेले सल्ले वजा उपदेश असलेली पोस्ट ही अपर्णा रामतीर्थकर यांच्या भाषणाने प्रभावित आहे. स्त्री शिक्षणाचा जोरदार विरोध करणाऱ्या या कथित समाजसेविकांचा विरोधाभास हा की त्यांनी स्वतः वकिलीचे शिक्षण घेतले आहेत आणि तरिही मुलींच्या शिक्षणाला विरोध करुन त्या स्वतःतीलच दांभिकपणा दाखवत आहेत.

या पोस्टची सुरुवात ज्या पद्धतीने केली आहे त्यामुळे अनेकदा पीडित भूमिकेत असलेल्या प्रत्येकाला पोस्टची सुरुवात वाचून तो विचार पटतो. कारण प्रत्येकाचे स्वतःचे म्हणून काही अनुभव असू शकतात, मात्र कधी कधी अशा व्यक्तींना आपले अनुभव हे सार्वत्रिक असल्याचाही गैरसमज होतो. त्यातूनच मग अशा मांडणीवर विश्वास ठेवायला सुरुवात होते. खरंतर प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेमाने, समजूतदारपणे वागावे हे शाश्वत आणि वैश्विक मूल्य आहे, पण जेव्हा हे वागणं फक्त महिलांवर बंधनकारक करत पुरुषांना यातून सूट दिली जाते, तेव्हा त्यातून सोयीस्करपणे आणि कदाचित नियोजनबद्ध पद्धतीने पुरुषप्रधान संस्कृतीला पाठबळ देण्याचा प्रयत्न होतो.

सध्या पालक आणि पाल्य या नात्यात पिढीतील अंतर आणि त्यांच्या अनुभव विश्वांमध्ये गतीने होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभुमीवर एक विचार (मार्गदर्शक दिशा) सांगितला जातो. तो म्हणजे पाल्यांचे दिशादर्शक (मार्गदर्शक) व्हा, त्यांचे नियंत्रक होऊ नका. या तत्वाचा विचार केला की मग साचेबद्ध उत्तर न देता त्यावर आपला दृष्टिकोन शांतपणे आणि संयमाने ठेवा आणि अट्टाहास न करता तो दृष्टीकोन स्वीकारायचा की नाही हा निर्णय समोरच्या व्यक्तीला घेऊ द्यात हा दृष्टिकोन मिळतो. मात्र या पोस्टमध्ये अपर्णा रामतिर्थकर अगदी साचेबद्ध आणि सर्व आजारांचा रामबाण उपाय अशा जाहिराती थाटात सुनेने (स्त्रीने) कसे वागावे असा उपदेश देत आहेत. जे आक्षेपार्ह आणि चुकीचे आहे, असे मला वाटते. त्यामुळे अशा स्वरूपाच्या साचेबद्ध आणि सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच सांगणाऱ्या लिंगभेदी पोस्टवर गांभीर्याने विचार करुन या पोस्ट सकारण नाकारायला हव्यात.

मुलीला तिचं घर कोणतं हा उपदेश देत या पोस्टची सुरुवात होते. हे सांगताना लिहिणाऱ्याच्या विचारप्रणालीत पुरुषप्रधानतेची बीजं किती खोलवर रुजली आहेत याचं स्पष्टपणे दर्शन होतं. कोणत्याही माणसाला (स्त्री-पुरुष) आपले लहानपण जेथे गेले त्या जागेशी काही जैविक व भावनिक नाते असते. ते सोडून जाण्याची भावना काय असते हे कदाचित आपल्याला विस्थापितांच्या अनुभवातूनही समजू शकेल. पण आयुष्याच्या एक महत्वाच्या टप्प्यावर अशापद्धतीने स्वतःचं मूळ सोडून दुसऱ्या ठिकाणी जाताना मानसिकपातळीवर काय घालमेल होते हे देखील समजून घेणं आवश्यक ठरते. ज्यावेळी मुलींना आपण जेथे लहानाचे मोठे झालो, ज्या माणसांनी आपल्याला जीवापाड प्रेम करत मोठे केले असे आपले माहेरचे ठिकाण आपले नाहीच असे सांगण्याचा प्रयत्न होतो तेव्हा हा फारच क्रूर आणि स्वार्थीपणाचा मानवी व्यवहार म्हणावा लागेल. यातील स्वार्थीपणा हा पुरुषसत्ताक व्यवस्थेचे समर्थन करणारा व त्याला अधिक बळकटी देणारा असतो.

पुरुषप्रधान संस्कृतीत मुलीने स्वतःचं घर सोडून सासरी जाणे हे अपेक्षित असते आणि त्याबद्दल कुणालाही काहीही घेणेदेणे नसते, त्यामुळे संवेदनशीलपणे ते संक्रमण समजून घेण्याचीही तसदी कोणाकडून दाखवली जात नाही. त्यामुळे सासर हेच यापुढे तुझे स्वतःचे घर आहे आणि यापुढे तु आमच्या घरी पाहुणी म्हणुन आहेस, त्यामुळे यापुढे आमच्याशी वागताना पाहुण्यासारखीच वाग, असे सांगणे. तसेच यापुढे जाऊन आता लग्न होऊन ज्या घरी जाते आहेस तेथेच तुझं मरण झालं पाहिजे. जगली तरी सासरी आणि मेलीस तरी सासरी हा जाणीवपूर्वक संस्कार (propoganda) रुजवला जातो. याला माझा व्यक्तिगत विरोध आहे.

मालिका बघण्याबाबत माझे व्यक्तिगत काही आक्षेप आहेत, पण हे आक्षेप रामतीर्थकर यांच्या सारख्या एकेरी हाक मारू नये छाप अर्थहीन आक्षेपांसारखे नाही. कारण अनेकवचनी हाक मारल्यावर अगदी माणुसपणाचे सर्व संस्कार होतात हा माझा भ्रम नाही आणि ज्यांचा आहे त्यांनी तो दुरुस्त करावा असेच माझे स्पष्ट मत आहे. त्याचं कारण हा एकेरीपणा एकमेकांच्या विश्वासातून आणि मैत्रीपूर्ण नात्यातून येतो. आणि हा टप्पा कथित सन्मानाच्या नाटकी वागण्यापेक्षा खूप महत्त्वाचा आहे. जेथे प्रत्येकजण वयाचे दडपण न घेता व्यक्त होतो. त्या व्यक्त होण्यात प्रचंड प्रेम आणि आदर असतो, जो नाटकी अथवा सामाजिक दाबावातून न येता मनातून आलेला असतो. याचं उदाहरण द्यायचं ठरलं तर तिर्थकरांना पटेल असं आईचं उदाहरण आहेच. त्यांनी त्यावर विचार करावाच.

जॉब-करीअर या महत्वाच्या गोष्टींना फालतु म्हणणे म्हणजे टोकच झाले. त्यापुढे जाऊन पैसा कमविण्यासाठी घराचा उंबरठा न ओलांडण्याचा सल्ला म्हणजे वास्तव नाकारत स्वतःच्याच कोशात राहणे आहे. आज पैसे ही आयुष्यातील सर्वस्व नसली तरी जगण्यासाठी (महिलांसाठी तर सन्मानाने जगण्यासाठी) अत्यावश्यक बाब झाली आहे. त्यामुळे नोकरी, पैसे याचं किमान महत्वही नाकारणे हा शुद्ध मूर्खपणा आहे.

तिर्थकरांचं महत्वाचं वेगळेपण म्हणजे त्या ज्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात त्यातून त्या अजूनही बाहेर पडलेल्या नाहीत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांना त्यांच्या नवऱ्याने कधीही प्रेमाने बाहेर फिरायला जायचे का असे विचारले नाही. त्यामुळे तसे विचारुच नये असा आट्टाहास त्या करतात. दैनंदिन जगण्यात काही नाविन्य शोधत जगण्याचा आनंद घेण्याशी या वकिल बाईंचा दुरान्वये देखील संबंध न आल्याने हे असे होत असावे असे मला वाटते.

'लग्नाच्या वरातीत भर रस्त्यावर चारचौघात नाचु नकोस, त्यामुळे माहेरच्या नावाला काळिमा लागेल', हा तर गमतीशीरच सल्ला. हा सल्ला देण्यामागे नाचणे (नृत्य) वाईट असते, त्यात चारचौघात नाचणे तर जास्त वाईट अशी काही गृहीतके असल्याचे लक्षात येते आणि त्यांची नृत्याविषयीची संकुचित समज व दृष्टिकोनही कळतो. पण यासर्वात त्या दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या आपल्या वंशाच्या दिव्याबद्दल मात्र काहीही आक्षेप घेत नाही. दुसरीकडे घरातल्याच लग्नाच्या वेळी महिलांनी गाण्यावर नाचणे म्हणजे यांना माहेरच्या नावाला काळिमा फासणे वाटते. काय काय केल्यावर आईच्या, वडिलांच्या व माहेरच्या नावाला काळिमा फासला जातो याबद्दलची तिर्थकरांची यादी तशी मोठी आहे. एकूणच संस्कृती रक्षण आणि कुटुंब बचावच्या बेगडी कामात त्यांना या यादीचा काहीसा फायदा होईलही, पण उत्क्रांतीच्या टप्प्यावर त्यांची ही यादी त्यांच्यातील उत्क्रांतीचा अभावच अधोरेखित करते.

"घराबाहेर पडताना लेगिन, जिन्स, टी-शर्ट असे कपडे वापरणं बंद कर व तसे कपडे घालुन फिरण्याचा अट्टाहास करु नकोस", असाही सल्ला त्या देतात. त्यांच्या मते यामुळेही कदाचित संस्कृती व कुटुंब धोक्यात आले असावे , त्यामुळे अशा सल्ल्यांवर येणारी पिढी हसण्यापलिकडे काही करेल असे वाटत नाही.

तिर्थकर यांच्या म्हणण्यानुसार अशा गोष्टी जर प्रत्येक आईने आपापल्या मुलीला मनापासून शिकवायला सुरुवात केली, तर कोर्टात व पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या पती-पत्नींमधील खटल्यांची व तक्रारींची संख्या कमी होईल. एकूणच त्यांच्या मांडणीचा हा गाभा. म्हणजे यातही त्यांचे गृहीतक हेच की पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारी आणि न्यायालयातील खटले स्त्रियांच्या चुकांचा परिपाक आहे. पण त्या यावेळी एवढही समजून घेण्याची तयारी ठेवत नाही की आपल्या समाजात आजही सासरी होणाऱ्या अत्याचाराला सहनच करायचे असते या त्यांच्या सारख्या मानसिकतेच्या स्त्रियांची संख्या प्रचंड आहे. कोणतीही स्त्री अत्याचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर नाईलाजाने पोलीस ठाण्याचा पर्याय निवडते. अनेक स्त्रीयातर हा पर्याय देखील निवडत नाही. अशा स्थितीत अत्याचार करणाऱ्यांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्यांऐवजी पीडितांनाच नसलेले सल्ले देणे म्हणजे त्यांच्या भाषेत माणूसपणाच्या नावावर कलंक आहे. हे असं करणं म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचा इतिहास व वर्तमान हेतुपुरस्कर विसरायचा आणि काहीतरी वेगळाच सांगत दिशाभूल करण्याचा हा प्रकार होय.

तिर्थकरांना नाते परस्पर समजुतीने समृद्ध करण्याच्या दीर्घ प्रक्रियेशी काही देणे नसल्यासारखे फक्त एकाने तडजोड करावी अशीच त्यांची मांडणी आहे. त्यांच्या भाषणांना मिळणारा प्रतिसाद या व्यवस्थेच्या लाभार्त्यांकडून व काहीसा स्वतःचे ठोस मत बनवू न शकलेल्या काठावर बसलेल्यांकडून येत आहे. मी जेव्हा एकदा त्यांचे भाषण ऐकायला गेलो होतो, त्यावेळी मी अनुभवले की अनेक पुरुष आपल्या घरातील मुलींना व महिलांना अगदी आग्रहाने (जबरदस्तीने) घेऊन आले होते. यात त्यांचा विचार त्यांची मळलेली वाट पुनर्जीवित करणे हाच होता. त्यामुळे बदलाच्या वाटेवर जन्माला आलेली ही पिढी हे स्वीकारायला तयार होत नाही आणि त्यांच्या आधीची पिढी हे सर्व त्यांच्या गळी उतरवण्याचा अट्टाहास करत राहते असा हा संघर्ष सध्या सुरू असल्याचे चित्र आहे.

( तिर्थकर यांच्या भाषणांबद्दल देखील अनेक आक्षेप आहेत, तेही लवकरच नोंदवेल.)

२९ नोव्हेंबर २०१७

कोपर्डी अत्याचार प्रकरणात फाशी, पुढे काय ?



“कोपर्डी” अत्याचाराच्या प्रकरणात जलदगतीने सुनावणी करत दोषीना अखेर फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा झाल्याची अनेकांची भावना आहे, ती तशीच माझीही. यासाठी प्रथमतः तपास यंत्रणांसह वकील आणि न्यायाधीशांचे आभार.

कोपर्डी मधील त्या शाळकरी मुलीवर ज्या क्रूर पद्धतीने अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर ज्या निर्घृणपणे तिचा खून करण्यात आला ते खुपच भयानक आणि माणुसकीला काळिमा फासणारे होते. अशा काळिमा फासणाऱ्या घटना खैरलांजी पासून अगदी कोपर्डी पर्यंत झाल्या. हा खैरलांजी ते कोपर्डीचा प्रवास म्हणजे वेदनांचाच प्रवास राहिला आहे. या प्रवासातील वेदना अजूनही कायम असल्याचेच चित्र आहे. कोपर्डी प्रकरणात दोषींना शिक्षा झाल्याने या वेदनांवर काहीशी फुंकर घातली जाईल, पण वेदना मात्र तशाच राहतील. कोपर्डी प्रकरणातील या शिक्षेच्या निकालाने अशाप्रकारच्या कोणत्याही घटनेत कठोर शिक्षा होईल, असा संदेश न्याययंत्रणेकडून समाजापर्यंत जाणे अत्यंत महत्वाचे होते. आजच्या निकालाने ते काही प्रमाणात झाले असे म्हणता येईल. पण खरंच असं होणार आहे का ?

महाराष्ट्रात प्रत्येक दिवशी सरासरी किती मुलींना अशा पद्धतीच्या अत्याचाराला सामोरे जावे लागते याची आकडेवारी बघितली तर धक्का बसेल अशी माहिती समोर येते. मग काही प्रश्न उपस्थित होतात,

ज्या पीडितांवर अन्याय, अत्याचार होतो त्या सर्व पीडितांना न्याय मिळतो का ?

जर न्याय मिळत नसेल तर का मिळत नाही ?

या अत्याचार पीडितांना न्याय मिळायला हवा की नको ?

अर्थात माणूसपण शाबूत असणाऱ्या प्रत्येकाला त्या पीडितांना न्याय म्हणजेच दोषींना शिक्षा मिळायलाच हवी असेच वाटेल.

मग अत्याचाराच्या प्रकरणात मोठा जनसमुदाय रस्त्यावर आल्याशिवाय न्याय मिळणार की नाही ?

प्रत्येक घटनेत असं रस्त्यावर येणं शक्यही आहे का ?

आणि दररोज होणाऱ्या या अत्याचाराच्या घटनांमध्ये असं रस्त्यावर येणं हे न्यायपूर्ण समाजाचं लक्षण मानायचे का ?

म्हणूनच या निकालासह “न्यायव्यवस्थेचे सक्षमीकरण” हा विषय अजेंड्यावर घ्यावा लागणार आहे.  तसे झाले नाही तर प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी कितीही योग्य वाटली तरी व्यवहारातच येऊ शकणार नाही हेही तेवढंच खरं. फारतर “लाखांचे मोर्चे” काढून एका प्रकरणात न्याय मिळवता येईल, अन्य प्रकारणांचे काय हा प्रश्न यथास्थिती आ वासून उभाच राहतो.

अत्याचार झालेल्या प्रत्येकाला वेळेत न्याय मिळण्यासाठी काय करावे लागेल यावर जेव्हा विचार करायला सुरुवात होते, तेव्हा मात्र व्यवस्थेतील सुधारणांमधील उदासीनता समोर येते. ती उदासीनता झटकण्याची आणि त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची नितांत गरज लक्षात येते. अशी राजकीय इच्छाशक्ती निर्माण होण्यासाठी नक्कीच मोठ्या प्रमाणात जनतेचा रेटा हवा असतो. कारण राजकारणी गर्दी पाहून निर्णय घेतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे. मग या मूलभूत परंतु मुळ आणि अत्यावश्यक मागणीसाठी  “लाखांच्या मोर्चाचा” अजेंडा “न्यायव्यवस्थेचे सक्षमीकरण” हा होऊ शकेल का ?

आज या प्रकरणातील दोषींना शिक्षा देण्यासाठी आवश्यक एवढी न्याययंत्रणाच अस्तित्वात नसणे हे काही कोणत्याही आरोग्यदायी समाजाचे लक्षण होऊ शकत नाही.

या प्रकरणाने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि समाजातील अशा पद्धतीने अत्याचार करणाऱ्या मानसिकतेला चाप कसा लावणार ? हेही प्रश्न ऐरणीवर आले. कोपर्डीच्या त्या बहिणीला सहन कराव्या लागलेल्या वेदना यापुढे कुणालाही सहन कराव्या लागू नयेत म्हणून हा मूलभूत अजेंडा घेऊन काम व्हायला हवे.

यासोबतच आणखी एक मूलभूत बाब समजून घेणे आवश्यक आहे असे वाटते. अत्याचार पीडितांना वेदनादायक जगणे जगायला लागण्यात ‘एकुण समाज रचनेत स्त्रीचे स्थान आणि अत्याचाराचे स्वरूप’ याचाही काही संबंध आहे का तेही बघायला हवे ? अनेकदा समाजात “ती स्त्री जिवंतपणी नरक यातना भोगते” असं बोललं जातं. नरक यातना म्हणजे काय याचा अर्थ खोलात जाऊन समजून घेतला की लक्षात येईल की, एखादा अपराधी एका विशिष्ट प्रसंगी अत्याचार करतो परंतु समाज तिला नाकारून, तिच्याकडे तिरस्काराने आणि अपमानास्पद पद्धतीने बघून जगण्यापेक्षा मरणे चांगले आहे असे विचार करण्याची वेळ आणतो. मग हाही प्रश्न या फाशीच्या निकालाने सुटणार आहे का ?

अत्याचाराच्या प्रसंगानंतरच्या त्या स्त्रीच्या त्रासात त्या अपराध्याएवढाच समाजाच्या तथाकथित मानसिकतेचा देखील  वाटा आहे हे स्वीकारावे लागणार आहे. जशी माणसाच्या शरीराला एखादी जखम होते तिला फक्त जखम म्हणून पाहिलं जातं आणि सोडून दिलं जातं तसं लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये होत नाही. इज्जतीचे सगळे ओझे स्त्रियांच्या माथी मारून पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुष मंडळी मुक्त आणि स्वैर राहतात. “योनी सुचिता” हा त्यातला कळीचा मुद्दा आहे. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच योनीला न बघता, तेथे हक्क सांगण्याच्या मानसिकतेचा परिपाक म्हणजे त्या अवयवाला पावित्र्याचा लेप देने आणि मग त्यातून तिला सामान्य माणूस म्हणून न बघणे, तिचं माणूसपण मान्य न करणे. स्त्रियांवर लैंगिक अत्याचार झाले की तिला द्वेषाने आणि तिरस्काराने बघणे हा त्याचा परिणाम. यावरचे उत्तर या फाशीने मिळणार आहे का ?

©प्रविण

०४ नोव्हेंबर २०१७

डॉ. गणेश देवींना समजून घेताना ...



"ज्ञान म्हणजे काय ? ते कोणी निर्माण केलं ? ते कसं मिळतं ? ज्ञानाची उत्सुकता का असते ? ज्ञान मिळवण्याची धडपड क असते ?" याचा आयुष्यभर शोध घेत, त्याचा पाठपुरावा करत मुक्तपणे जगणारा माणुस म्हणजे डॉ. गणेश देवी होय. वयाच्या १७ व्या वर्षापासून ४४ व्या वर्षापर्यत दररोज न चुकता पुस्तकाची ३०० पानं वाचणारा हा माणूस.




वयाच्या ४५ व्या वर्षी बडोद्यामधील  (गुजरात) सयाजीराव गायकवाड विश्वविद्यालयातील इंग्रजी विषयाची प्राध्यापकी सोडून आदिवासींमध्ये त्यांच्याच जीवनशैलीत जगू लागला. सुरुवातीचे दोन वर्ष तर डॉ. देवी आदिवासींसोबत एकही शब्द न बोलता एकत्रितपणे बसून राहत. फक्त आदिवासींना ऐकत, न्याहाळत व निघून जात. या सर्व प्रकाराच्या शब्दांशिवायच्या संवादाला गणेश देवी 'निशब्द अड्डा' असं संबोधतात. पुढे मग ते त्या नि:शब्द अड्ड्यात काही वर्तमान पत्र आणुन ठेवत व आदिवासी बांधव उत्सुकतेने ते न्याहाळत बसत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील हा अभ्यासक - संशोधक स्वतःपासून कमालीचा आलिप्त राहून जगाशी जोडला जातो. हे जोडलेपण तेथील मातीशी जोडुन घेण्यापासून सुरू होते आणि पुढे तेथील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुजरात राज्यात बडोद्यामधील तेजगड या आदिवासी भागात त्यांचे काम होय.



सामुहिक प्रयत्नातून व सहभागातून उभ्या राहिलेल्या 'आदिवासी अकॅडमी'च्या माध्यमातून आदिवासींचे जीवन आणि पर्यावरण समजून घेत त्या ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्याचे महत्वाचे काम तेथे झाले आहे. एकीकडे लोक भाषांना सुनियोजित पद्धतीने संपवण्याचे प्रयत्न होत असताना तेजगडमध्ये ८०० प्रादेशिक भाषांमध्ये बोलणाऱ्या ८०० झाडांचे 'भाषावन' उभे केले आहे. या झाडांना हात लावला की ती झाडे त्यांच्या भाषेत बोलू लागतात. तेजगडमधील आदिवासी म्युझियम हे तर तेथील आदिवासींच्या जगण्याचा जीवंत व समृद्ध ठेवाच आहे. अशा पद्धतीने  बायोसेन्साॅरच्या मदतीने झाडांना बोलते करण्यातून व म्युझियमच्या माध्यमातून ईतिहास करण्याच्या कृतीतून भाषातज्ञ असणाऱ्या गणेश देवींमधील वैज्ञानिक आणि ईतिहासकाराचे सुक्ष्मरूप अनुभवता येते.



डॉ. गणेश देवींच्या या कामातून त्यांच्या सातत्यपुर्ण कृतीप्रवणतेचा गुण स्पष्टपणे अनुभवायला मिळतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रादेशिक लोक भाषा जतनाचे मोठ काम करत असताना अभ्यास आणि संशोधनाला थेट जमिनीवरील रचनात्मक कामाला जोडून घेण्याची त्यांची कामाची पद्धत त्यांना म्हणूनच विशेषत्व बहाल करते. जगभरातील 40 ते 50 देशांमध्ये अभ्यास, अध्यापन आणि संशोधनासाठी गेलेल्या या माणसात जसा व्यापक जागतिक दृष्टिकोन दिसतो तसेच तळागाळातील सामन्यातील सामान्याचं जगणं समजून घेणारा सहृदय दृष्टिकोन देखील दिसतो. त्यांच्या स्वतःच्या मते ते एकाचवेळी तीन जगांमध्ये व भाषांमध्ये राहिले आहेत. ते तीन म्हणजे आदिवासींचे जग, तुमचं आमचं नागरी जग आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील जग होय. तसेच तीन भाषा म्हणजे मराठी,  गुजराती आणि इंग्रजी भाषा होय. त्यामुळेच त्यांच्या विचारांना जसा वैश्विक संदर्भ असतो तसा स्थानिक वास्वववादी आधारही असतो. त्यातूनच त्यांची मांडणी अधिक तर्कसंगत आणि कालसुसंगत झाल्याचे लक्षात येते.



विनोबांचा 'Think Globally Work Locally' हा विचार प्रत्यक्षात आचरणात आणण्याचे भरीव काम डॉ. गणेश देवींनी केले आहे. 'अक्षर मानव'च्या संवाद - सहवास या उपक्रमात त्यांच्या सोबत जो वेळ जगता आला त्यातील एक महत्वाची बाब म्हणजे त्यांनी चर्चेसोबत दिलेला एक कृतीकार्यक्रम होय. त्यांच्यामते स्थानिक पातळीवर प्रत्येक गावात तरूण मातांना एकत्र करून 'मातृमंडळ' तयार करून त्यांना आपल्या कुटूंबात स्वातंत्र व निर्भयता रुजवण्यास प्रोत्साहित केले. त्यांना काही पुस्तके वाचायला देऊन नवा विचार दिला आणि त्याच्या छोट्या छोट्या बातम्या व्हाट्सअॅप , फेसबुकवर पाठवल्या तर स्वातंत्र व निर्भयतेचे वातावरण निर्माण होण्यास मोठी मदत होईल. मातृभूमीचा भावनिक अतिरेक होत असताना त्यावर 'मातृमंडळ' प्रभावी ठरेल.



असाच काहीसा कृती कार्यक्रम फ्रान्समध्ये बिघडलेल्या परिस्थितीत व कडव्या टोकदार उजव्या शक्तींच्या प्रभावाला उत्तर देण्यासाठी एक चळवळ उभी राहिली होती. त्या अंतर्गत फ्रन्समधील लोकांनी दररोज रात्री आपल्या जवळच्या, ओळखीच्या व्यक्यींसोबत १० मिनीटे बोलण्याचे सुरू केले. त्याच्या परिणाम स्वरूप कडव्या टोकदार उजव्या शक्तींना प्रभावी उत्तर तर मिळालेच सोबत २०१७ च्या फ्रान्स अध्यक्षीय निवडणुकीत देखील सकारात्मक बदल घडून आला.
असाच काहीसा शुल्लक वाटणारा कार्यक्रम गांधींनीही दांडी सत्याग्रहाच्या रूपाने केला होता. त्यावेळी त्यांच्या त्या कार्यक्रमाला मोतीलाल नेहरूंनी निरूपयोगी ठरवले ज्यावर गांधींनी दिलेले एका ओळीचे उत्तर होते, 'करके देखो' होते. त्यावर मोतीलाल यांना दांडी सत्याग्रहात सहभागी होण्याच्या अगोदरच अटक झाली व त्यांनी गांधींना उत्तर पाठवले 'करनेसे पहलेही देख लिया'. हीच अनुभूती गणेश देवींच्या या कृतीकार्यक्रमासाठीही लागु झाली तर विशेष वाटायला नको.
म्हणूनच 'करके देखो'



डॉ. गणेश देवी स्वतःला कायम विद्यार्थीच असल्याचे मानतात. त्यांच्यामते त्यांच्या जगण्याचा व कामाचा मार्ग त्यांनी स्वतः ठरवलेला आहे. पण त्यावर कसे चालायचे, मार्गक्रमण करायचे हे त्यांना त्यांचे विविध गुरू सांगतात. डॉ.  गणेश देवी सर्वांनाच वेगवेगळ्या विषयांसाठी गुरू मानतात. जसे मनुस्मृतीच्या विश्लेषणासाठी ते डाॅ. आंबेडकरांना गुरू मानतात तर ग्रामविकासाच्या संकल्पनेसाठी गांधींना गुरू मानतात. अशा पद्धतीने ते अनेकांना विषयानुरूप आपले गुरू मानतात. आदिवासींना ते स्वतःचा सर्वात चांगला गुरू मानतात. या सर्व गोष्टींतून त्यांचा विनम्रपणा आणि ज्ञानोपासनेच्या वृत्तीची प्रचिती होते.

ज्ञानाच्या संदर्भातील संकल्पना स्पष्ट करताना ते सांगतात की, 'ज्ञान आणि स्वातंत्र्यात खुप जवळचा संबंध असून जो मुक्त आहे त्याला ज्ञान मिळवता यायला हवे. पण येथे ज्ञानामुळे माणूस मुक्त होतो अशी मांडणी होते. ज्ञानावर मालकी मिळवण्याचे मोठे प्रयत्न होत असून त्यामागे केवळ नफा कमावण्याचा हेतू आहे. पाठीचा मणका वाकवावा लागेल अशी कष्टाची कामे इतरांवर ढकलण्यासाठीही ज्ञानाचा वापर होतो आहे. लिपी हे स्वार्थाचं स्पष्ट रूप आहे. कुठलीही भाषा कुठल्याही लिपीत लिहिता येते. भाषेचा व लिपीचा काडीचाही संबंध नाही. भाषा लिपीवर अवलंबून नाही तर व्यवसाय देण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. अनेकदा लिपीचा भाषेवर अन्याय होतो. लिखीत व्याकरण, लिपी ही भाषेची जरूरी नसते. अगदी साडेतीन वर्षांपर्यंतच्या मुलांनाही अवघड आणि किचकट भाषेतील वाक्ये येतात हे त्याचे एक चांगले उदाहरण आहे.



भाषा बोलणारे जर रेल्वेचे इंजिन मानले तर व्याकरणवाले त्या रेल्वेच्या इंजिनचा शेवटचा बडा ठरतील. व या व्याकरणरूपी डब्याला शेवटी इंजिनाच्याच मागे धावावे लागते. त्याप्रमाणे व्याकरण हे देखील भाषा बोलणाऱ्यांची मागे धावत असते. भाषा बोलणारच भाषेला स्वतंत्र बनवतात. शिक्षक हा ज्ञानासाठी आवश्यक नसून, शिक्षकांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी, रोजगारासाठी भाषा शिकवायला सुरुवात केली. आदिवासी त्यांच्या ढोलाच्या एका आवाजातून २४ प्रकारचे संदेश पाठवू शकतात. हि त्यांची स्वतंत्र अभिव्यक्ती आहे.



आपण कसे बघतो ते बघणे, आपण कसा विचार करतो त्याचा विचार करणे अर्थात प्रक्रिया समजून घेणेहे डॉ. गणेश देवी यांच्या अभ्यासाचे, संशोधनाचे आणि कामाचे मुख्य सूत्र राहिले आहे. या सूत्राबद्दल ते आग्रही आहेत. कुठल्याही कामात झोकून देऊन शिस्तीने, प्रामाणिकपणे आणि वेळेवर काम करणे हि त्यांच्या कामाची पद्धत असल्याचे प्रकर्षाने लक्षात येते. त्याच्याच परिणाम स्वरूप त्यांनी आजपर्यंत मोठे काम निर्माण केले. ३००० लोकांना सोबत घेऊन ३० राज्यांचे लोक भाषा सर्वेक्षणाचे काम जे सरकारने शक्ती असतानाही करणे टाळले तेच काम डॉ. गणेश देवी यांनी सरकारच्या मदतीशिवाय लोकांच्या सहभागातून केले. त्या सर्वेक्षणाचे ३० खंड प्रकाशित करून ते देशाला अर्पण केले. प्रकाशनासाठी त्यांनी बाहेर देशातील अनेक नावाजलेल्या प्रकाशकांची प्रकाशनासाठीची मागणी नाकारून जाणीवपूर्वक ते प्रकाशनाचे काम देशातीलच प्रकाशकाला दिले. यातून त्यांचे कामाच्या प्रत्येक टप्प्यावर असलेले लक्ष आणि प्रत्येक निर्णयात अधिक विधायकता आणि अर्थपूर्णता आणण्याचे प्रयत्न दिसतात. या सोबतच आदिवासी अकॅडमी विकसित करण्याचे ४० ते ५० कोटींचे काम  असो  की 'भाषा' ट्रस्ट व प्रकाशन अंतर्गत २०० ग्रंथांचे प्रकाशन या सर्व कामांत त्यांच्या कार्यपद्धतीचा ठसा उमटलेला दिसतो.



कोणतेही काम दीर्घकाळ टिकण्यासाठी त्या कामात पुढच्या पिढ्यांचा सहभाग अत्यावश्यक असल्याचे ते मानतात. त्यातूनच त्यांनी आदिवासी अकॅडमीच्या सर्व पदांचा त्याग करून ते काम नव्या पिढीकडे सोपविले. जीवनात अंगिकारण्याच्या काही महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख करताना ते सांगतात की, 'अपरिग्रह हे आयुष्यातील महत्वाचे, अर्थपूर्ण व शक्तिशाली शस्त्र आहे. तसेच मनातून भीती काढून टाकणेही अत्यवाश्यक आहे. भय काढून टाकणे म्हणजे मृत्यूबद्दल बेदरकार होणे नसून मृत्यूबद्दल आदर ठेवणे होय.' डॉ. गणेश देवी यांच्या वेळोवेळी घेतलेल्या स्पष्ट वैचारिक भूमिकांमुळे आणि परिणामकारक संघर्षमय रचनात्मक कार्याने त्यांच्यावर जीवघेणे हल्ले देखील झाले. परंतु मृत्यूच्या भयाला दूर केल्याने व कामावरील अपरिग्रहवादी निष्ठेमुळे त्यांनी त्या हल्ल्यांना निकामी तर ठरवलं. सोबत त्यांच्यातील माफ करण्याच्या मानवी वृत्तीने त्यांनी त्या हल्लेखोरांना मोठ्या मानाने माफ केले. यात त्यांना त्यांच्या सतर्क आणि सजग 'दृष्टी'नेही मोठी साथ दिली. त्यांच्या स्वतःच्या निरीक्षणाप्रमाणे त्यांच्या कानाच्या तुलनेत त्यांचे डोळे हे जास्त जलद व तीक्ष्ण आहेत,  त्याचा या सर्व घटनांना सामोरे जाण्यात खूप जास्त उपयोग झाला.



वयाच्या ११व्या वर्षांपासून अध्यात्मापासून अलिप्त झालेले आणि आत्म्याचा शुद्ध न घेता, आत्म्याच्या शोधाचा शोध घेणारे डॉ. देवी देव आणि आत्म्याबाबत स्पष्टपणे नमूद करतात की, 'शब्द आहेत म्हणूनच देव आहेत. आपण घोडा, शेळी या सारखे प्राणी असतो तर देव असला नसता. देव म्हणजे भाषा, लहान मुलांतील जाणिवा, सामाजिक संस्था होय. आस्तिक म्हणजे अस्तित्व स्वीकारणे होय.  आपल्या या काळात 'निर्भयता' हाच देव आहे.'आदिवासींना भुकविना, कर्जविना, रोगविना, आणि स्थलांतर विना जगता येणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करताना ते सांगतात की, 'आदिवासी हे स्वतःला पृथ्वीचा मानतात पण पृथ्वीला स्वतःची मालकी मानत नाही. "I belongs to earth, doesn't belongs to me" म्हणताना त्यांना तेथे अपेक्षित असलेली भावना म्हणजे पृथ्वीच्या असंख्य घटकांपैकी आपण मात्र एक सूक्ष्म घटक असल्याची नम्र जाणीव होय. 'आदिवासींच्या साहित्याची पुस्तके करायची ठरली तर सर्व साधारणपणे ४०,००० पुस्तकांचं आदिवासी साहित्य तयार होऊ शकेल. आदिवासी वर्तमानकाळात जगतात म्हणून ते प्रामाणिक असतात. मात्र भूतकाळाचा शोध लागल्यापासून नागरीकरणातील माणसे अप्रामाणिक वागायला लागली, खोटं बोलायला लागली आहेत.'



भारतीय भाषांचे जागतिक स्तरावरील महत्व व स्थान अधोरेखित करताना ते आवर्जून सांगतात की, 'जगातील सर्वोच्च ३० भाषांमध्ये भारताच्याच १२ भाषांचा सहभाग आहे. १००० वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेल्या जगातील १८  भाषांमध्ये भारताच्याच ८ भाषा आहेत. चांगले तत्वज्ञान व साहित्य असलेल्या जगातील ७ भाषांमध्ये भारताच्याच ३ भाषा आहेत आणि जगात सर्वात जास्त गतीने वाढणारी भाषा ही हिंदी आहे.' 'सामंतशाही (Fascism), प्रत्यक्ष नेता वाईट अथवा चुकीचे काम न करता तसे काम करण्यास पोषक विचारांचा मोठा समाज निर्माण करणे (Hegemony), आणि निवडून न आलेल्यांची दंडेलशाही (Terrini of unelected) अशा धोकादायक घटकांबरोबर सत्य, अहिंसा, आणि स्त्रीत्वाने लढावे लागेल. गांधींनी इंग्रजी राजवटीच्या पुरुषी वर्चस्वाला स्त्री प्रतीकांच्या आधाराने विरोध केला. रामकृष्ण परमहंस देखील स्वतःला मनाने स्त्री मानत, शिवाचे अत्युच्च रूप म्हणून अर्धनारी नटेश्वर मानले जाते. त्यातूनच स्त्री प्रतीकांची स्थापना झाली. काही गोष्टी पुरुषी दृष्टीने समजून घ्याव्या लागतात तर काही गोष्टी समजून घेण्यासाठी स्त्री दृष्टीच आवश्यक असते' असेही ते नमूद करतात.



२०० वर्षातील संकल्पनांचा आढावा घेताना समता, स्वातंत्र्य, बंधुता,या मूल्यांसोबतच राष्ट्र - राष्ट्रवाद, व्यक्ती - व्यक्तिवाद, यांचाही ते अचूकपणे वेध घेतात. अँडम स्मिथ आणि कार्ल मार्क्स यांच्या मांडणीत जमीन अस्मानाचा फरक असला तरी व्यक्तीला स्वातंत्र्य आणि न्याय मिळावा हा त्यांच्यातील सामान हेतू ते अचूकपणे अधोरेखित करतात. आजही आपल्याकडे व्यक्तीच्या न्याय स्वातंत्र्यासाठी व हक्कांसाठी राज्यसत्तेवर नियंत्रण घालण्याची मांडणी अस्तित्वात नसून हि मांडणी होण्याची गरज आहे असेही ते सांगतात. सामान्यतः विरुद्ध टोकाच्या गोष्टींमध्ये कमालीची विधायक समानता शोधण्याची त्यांची दृष्टी म्हणूनच महत्वाची वाटते. त्यांना अभिप्रेत असलेला व्यक्तिवाद हा बेफान व्यक्तिवाद (Reckless individualism) नसून तो निर्भय व्यक्तिवाद (Fearless individualism) आहे. भविष्यात तिसरे महायुद्ध हे बेफान व्यक्तिवाद विरुद्ध निर्भय व्यक्तिवाद यामध्ये होण्याची शक्यताही ते वर्तवता.



'१८ व्य शतकापासून पुढे स्वातंत्र्य व राष्ट्र या संकल्पना एकत्रित आल्या होत्या. स्वातंत्र्य मिळवायचे म्हणजे ते एका राज्यकर्त्यांकडून दुसऱ्या राज्यकर्त्याकडे देणे असे नसून राज्यकर्त्याच्या ताब्यातील स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला बहाल करणे आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य आणि राष्ट्र या संकल्पना वेगळ्या झाल्या. आज मात्र स्वातंत्र्य आणि राष्ट्र या दोघांत संघर्षाची स्थिती निर्माण होत आहे. आता राष्ट्राचे स्वातंत्र्य त्या राष्ट्रात राहून टिकवता येणार नाही तर राष्ट्राबाहेर वैश्विक युती करून टिकवावे लागणार असल्याचे' डॉ. देवी सूचित करतात.



'पोस्ट ट्रुथ' बद्दल आपले मत मांडताना ते शासन आणि लोक यांच्यातील आंतरसंबंध स्पष्ट करतात, 'अगोदर शासनात आणि लोकांमध्ये एक करार असत. त्यात लोकांनी शासनाला कर देणे आणि शासनाने लोकांना सुविधा व सुरक्षा देणे असा व्यवहार होता. त्यावेळी कराच्या  आधारेच लोकांचे नागरिकत्व ठरत. पण आता हा करार बदलत आहे. उद्योपतींचं राज्य सुरु झाले तेंव्हापासून राज्यसत्ता पोखरून निघत आहे. अशा स्थितीत राज्यसत्तेकडे शक्ती, कुवतच शिल्लक नाही. सत्ता आता सरकारांकडे राहिली नसून उद्योगपतींकडे गेली आहे. भविष्यात स्वतःचा नफा, प्राप्ती वाढवण्यासाठी सरकार उद्योगपतींसाठी देखरेखीचे (Servillence) आणि माहिती पुरवठादाराचे (Information Vendering)चे काम करेल. त्यासाठीच आज शारीरिक ओळखेला डिजिटल ओळखेसोबत बंधनकारक केले जात आहे. हेच पोस्ट ट्रुथ आहे. येणाऱ्या काळात जे लोक सत्तेपासून व त्यांच्या देखरेखीपासून दूर जातील तेच सुरक्षित राहतील आणि टिकतील. जगाची वाटचाल हुकूमशाहीकडे होत असून लोकही ते स्वीकारत आहे.'



भारतातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोचित होत जाणारा अवकाश, वैचारिक मतभेदांप्रती असहिष्णुता आणि त्यातून झालेले कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे यांच्या हत्या यांची निंदा करण्याच्या भूमिकेला समर्थन म्हणून डॉ. देवींनी स्वतःचा साहित्य अकादमी पुरस्कार परत केला. नंतर त्यांनी सुरु केलेल्या 'दक्षिणायन' अभियानाबद्दल सांगताना ते म्हणतात की, 'दक्षिणायन या वर्षाचा असा काळ असतो जेंव्हा रात्र मोठी असते आणि दिवस लहान झालेला असतो. गेली ३० वर्ष जगात उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग पडले आहेत. उत्तर हे समृद्धीचे प्रतीक मानले गेले आणि दक्षिणेला गरिबीचे प्रतीक मानले गेले. २०० वर्षात विकासाचे स्वरूप बदलून गेले व पाश्चिमात्यीकरण की पूर्वीकरण अशी मांडणी होत आली आहे. प्रत्येकाला उत्तरेला म्हणजेच सत्तेकडे (दिल्लीकडे)  जाण्याची स्वार्थी इच्छा होत आहे. म्हणूनच मग या अभियानाला 'दक्षिणायन' हे नाव दिले आहे. येणाऱ्या वर्षभरात दक्षिणायनच्या विचारांची १०० पुस्तके आणि गांधी विचारांची परिणाम सांगणारी २० पुस्तके तयार होतील. ज्याचा या अभियानाला दिशा देण्यासाठी मोठा उपयोग होईल.'



डॉ. गणेश देवींना समजून घेताना त्यांच्या कामातील प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या एवढीच मेहनत घेत सक्रियपणे सहभागी असणाऱ्या डॉ. सुरेखा देवी यांना समजून  घेतल्याशिवाय  डाॅ. गणेश देवी  यांना समजून घेण्याची प्रक्रिया पूर्ण होऊच शकणार नाही.  यांना दिलेली आयुष्यभराची अनमोल साथ-सोबत मानवी नाते संबंधांमधील एक आदर्शच म्हणावा लागेल. २०० रिसर्च पेपर, २५ PhD साठी मार्गदर्शन करणाऱ्या आणि नोबेल पारितोषिक निवड समितीवर दोनदा काम केलेल्या डॉ. सुरेखा देवी व डॉ. गणेश देवी यासर्व कामातून जगण्याच्या संदर्भातील एक वेगळे भान नव्या पिढीला नक्कीच देऊन जातात.





प्रविण सिंधू भिमा शिंदे

pravinsindhubhima@gmail.com


Published at -

https://goo.gl/aqJ7D1

http://sumbaran.com/article/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8

२३ ऑक्टोबर २०१७

सिक्रेट सुपरस्टार: ड्रीम देखणा तो बेसिक होता है

'सिक्रेट सुपरस्टार' हा प्रत्येक मुलीने आपल्या आईसोबत बघायलाच हवा असा चित्रपट आहे. तसेच मुलांनी बहिणीसोबत आणि हो मैत्रिणीसोबत बघावा असाही आहे.

आईमधील आणि मुलीमधील नात्याची एक सुंदर, हळवी आणि संवेदनशील गुंफण चित्रपटात ठिकठिकाणी पाहायला मिळते. ही आई मुलीला एक संघर्षमय परिस्थितीत जन्म तर देतेच पण तेवढ्यावरच न थांबता मुलीला स्वप्नही बघण्याचा अवकाश देते. मुलीच्या जन्मासाठी सुरू केलेला संघर्ष पुढे मुलीला दाखवलेल्या स्वप्नांच्या पूर्णत्वापर्यंत कसा होतो हा एक महत्वाचा प्रवास म्हणजे या चित्रपटाचा मुळ गाभा आहे.
(आई-नजमा, मुलगी-इनसिया म्हणजे औरत/बाई)


हा चित्रपट जीवनाचे कोणतेही न पेलवणारे तत्वज्ञान आपल्याला अजिबात सांगत नाही. परंतु तो जगताना स्वप्न पाहण्याची आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मात्र जरूर देतो. ही प्रेरणा म्हणजे सहज न लक्षात येणारी बंडखोरीची अतिसूक्ष्म बीजेच आहे. ज्यात विशेष असे काहीच वाटत नाही, परंतु जेव्हा त्या बीजाला विचारांच्या जमिनीत रुजल्यानंतर अंकुर फुटतात तेव्हा सुरू होतो सामान्य व्यक्तीचा (येथे आईचा आणि मुलीचा) असामान्य प्रवास.

यासोबतच हा चित्रपट मॉडर्न कॉलनीमध्ये राहणाऱ्या जुनाट आणि कुजक्या विचारांच्या मानसिकतेला छेद देण्याचाही प्रवास आहे. घरात होणाऱ्या हिंसाचाराचा आपल्या मुलांवर वाईट परिणाम व्हायला नको म्हणून खोटं बोलण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारी संवेदनशील आई जशी येथे दिसते, तसाच छोट्या छोट्या गोष्टींसाठी बायकोवर हात उगारणारा हिंस्र बापही यात दिसतो. यात तो आपल्या मुलावर (फक्त मुलावर, मुलीवर नाही) मारहाणीचा वाईट परिणाम होऊ नये असा दिखाऊपणा देखील करताना दिसतो.


'सिक्रेट सुपरस्टार' मध्ये प्रतीक म्हणून जरी मुस्लिम समाजाचे उदाहरण घेतले असले तरी त्यात बघायला मिळालेली परिस्थिती थोड्याफार फरकाने सर्वच समाजात आहे. मग सुरू होतो त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा आणि परिस्थितीचे उत्तर शोधणारा मुलीचा आणि तिच्या आईचा प्रवास. या प्रवासाला सुरुवात होण्याची बीजे त्या मुलीच्या जन्मापासून तर रुजायला सुरुवात होतेच, पण त्याला खरे अंकुर फुटतात ते आईने तिच्या हातात वयाच्या सहाव्या वर्षी गिटार आणून दिल्यानंतर.

स्वयंपाक बनवताना भाजीत मीठ कमी पडणे अथवा ते टाकायला विसरणे ही अगदीच सामान्य आणि फक्त सामान्य नाही तर वैश्विक सामान्य गोष्ट आहे. परंतु  तरीही या वैश्विक सामान्य गोष्टीला दिला जाणारा प्रतिसाद हा पुरुषा पुरुषांप्रमाणे बदलतो. तरीही कोणतीही व्यक्ती अधिक तणावपूर्ण वातावरणात जगत असेल तर त्या व्यक्तीच्या बाबतीत विसरण्याचे प्रमाण अधिक अनुभवायला मिळते. त्यात घरातील एखादी व्यक्ती (येथे नवरा) हिंसक असेल आणि घरातील वातावरण नेहमीच दहशतीचे असेल तर जास्तच अनुभवायला मिळते. मग हा प्रवास फक्त भाजीत मीठ टाकायला विसरणे येथपर्यंत न राहता दैनंदिन जगण्याच्या अनेक गोष्टींमध्ये दिसू लागतो. याचे अधिक योग्य विश्लेषण मनोविश्लेषक उत्तम पद्धतीने करतील. येथे मुद्दा एवढंच आहे की, घरातील छोट्या छोट्या अनियमितेंमध्ये बायकोला मारझोड करणाऱ्या व्यक्ती (येथे पुरुष) तेवढ्यावरच थांबत नाही. तर आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्याचेही नियंत्रण आणि नियमन करायला सुरुवात करते. ते कसे हे 'सिक्रेट सुपरस्टार' हा चित्रपट दर्शकाला दाखवतो.

या चित्रपटाची आणखी एक विशेष बाब म्हणजे रियालिटी शो पासून दूर राहणारा आणि पुरस्कार कार्यक्रमांना टाळणारा आमीर खान यात शक्ती कपूर या त्याच्या मुळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध असणाऱ्या व्यक्तीची भुमिका साकारत आहे. त्याला खुप कालावधीनंतर अशा भुमिकेत बघणे खुपच उत्सुकतापूर्ण आहे. शक्ती कपुर कोण आहे, कसा आहे या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपण चित्रपट गृहांपर्यंत आवर्जुन जा. त्यात लक्षात घेण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे शक्ती कपुरच्या व्यक्ती चित्रातून त्या पद्धतीच्या वास्तव जगातील व्यक्तीमत्वांना लगावलेली चपराक. खूप काही आव आणून जगणाऱ्यांचे समर्पक चित्रण या व्यक्तिरेखेत बघायला मिळते. पण त्यामुळे त्या व्यक्तीला फक्त पांढरं किंवा काळं अश्या दृष्टीने बघून खलनायक बनवले जात नाही. तर त्याच्यातील गुणवत्तेला आणि संवेदनशील माणसाला देखील समोर आणले जाते.


चित्रपटात आणखी दोन व्यक्तिरेखा देखील दर्शकाचे मन जिंकून घेतात. एक म्हणजे 'सिक्रेट सुपरस्टारचा (इनसियाचा) मित्र (चिंतन). हा मित्र चित्रपट संपेपर्यंत अनेक पातळ्यांवर आपली छाप सोडतो. आणि दुसरा मुलीचा छोटा भाऊ. हा छोटा भाऊ म्हणजे आई आणि मुलीच्या आयुष्यातला एक निरागस पुरुष. परंतु त्याचे ते निरागसपण टिकेल की तोही वडीलांसारखा होईल याचीही काळजी आई करत असते. ते कसं हे चित्रपट बघताना नक्की समजेलच.

म्हणूनच सामान्यातल्या सामान्य माणसाला समजेल आणि त्यांच्यातही सकारत्मक बदलाची बीजे पेरेल अशा या चित्रपटाला आवर्जून चित्रपटगृहात जाऊन बघा.
(खरंतर चित्रपटातील काही प्रसंग घेऊन त्याच्याविषयी मत व्यक्त करावेसे वाटले होते पण नंतर ते रद्द केले. कारण चित्रपटातील प्रसंग सांगुन चित्रपट पाहताना तुमच्या मनात उमटणाऱ्या स्वाभाविक प्रतिक्रियांना आणि विचारांना असे केल्याने मर्यादित केल्यासारखे होईल.)

#AamirKhan #SecretSuperstar #आमिर_खान #सिक्रेट_सुपरस्टार


  
The way My these two new friends from Hyderabad were enjoying the film with lots of curiosity and respect was really appreciable. That time I feel that while watching movie #SecretSuperstar , they and me were at the same ground of emotions and thoughts. That's why I feel respect for them.

One more thing that they are a good human who can understand the innocent feelings and thoughts of life.

This reflection is directly connected with their response to film. Means they were understanding the massage of situations narrated in film which director wants to say.