२६ एप्रिल २०१७

विचारांचा वेध घेणारे संमेलन ...

 

(जानेवारी २०१७ मध्ये पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून वृत्तवेध हा अंक काढायचा होता. त्यासाठी "विचारवेध संमेलने" हा विषय निवडला होता. त्या अंकात लिहिलेले हे संपादकीय ...)


ही पिढी इतिहासापासून खूपच अंतर पडल्याने ऐतिहासिक वास्तवापासून दुरावलेली आहे. आज माहितीत आहे तेवढाच भाग म्हणजे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य ही काहीशी मानसिक अवस्था त्यांच्यात दिसू लागली आहे.


विचारवेध संमेलनांची सुरुवात ही बाबरी मस्जिद विद्ध्वंसानंतर वैचारिक मंथनासाठी झाली. भूमिका होती समाजात वैचारिक जडणघडणीला एक दिशा देणे. या दिशेत माणसाचे माणूसपण हा केंद्रबिंदू होता. ते माणूसपण वैश्विक आणि नैसर्गिक आहे हा संदेश सर्व समाज घटकांपर्यंत पोहचवण्याचे काम विचारवेध संमेलनांनी संपूर्ण शक्तीनिशी केले. मध्यंतरीच्या काळात या प्रबोधन प्रक्रियेत काहीसा खंड पडला.

दरम्यानच्या काळात एका नव्या पिढीने समाजात प्रवेश केला होता आणि या पिढीवर जागतिकारणाचा मोठा प्रभाव होता. ही पिढी इतिहासापासून खूपच अंतर पडल्याने ऐतिहासिक वास्तवापासून दुरावलेली आहे. आज माहितीत आहे तेवढाच भाग म्हणजे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य ही काहीशी मानसिक अवस्था त्यांच्यात दिसू लागली आहे. त्यावर उपाय म्हणून पूर्वग्रहांनी चिकित्सा, टीका करणे परिपूर्ण उत्तर नाही. तर त्यासाठी या पिढीला अनभिज्ञ असलेले संदर्भ माहिती करून देत नव्या स्वरूपात, तरुणांना समजेल अशा भाषेत मांडणे गरजेचे आहे. हीच भूमिका विचारवेध संमेलनांनी घेतलेली दिसून येते.

जागतिकीकरणा आधीचा काळ आणि नंतरचा काळ यात मोठा बदल झाला आहे. पूर्वीच्या काली जगण्याला असलेला वेग, सामाजिक दबाव, जगण्याबद्दलच्या अपेक्षा इत्यादी अनेक बाबींचे स्वरूप आणि तीव्रता बदलल्या आहे. हा बदल टिपत प्रबोधनाची दिशा आणि धोरणे  ठरवण्याचे काम अनेक सामाजिक चळवळींना करण्यात अपयश आले आहे. त्यातूनच तरुणाईचा सहभाग कमी कमी होत आहे.

परिवर्तनवादी चळवळींनी बदल स्विकारण्याच्या भूमिकेचा वारंवार उच्चार केलेला आहे. तरीही आधुनिक   तंत्रज्ञान आणि कामाच्या पद्धती स्वीकारताना त्यांनी पुरेशी हालचाल केलेली दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर विचारवेधने प्रबोधनासाठी सुरु केलेला नवं माध्यमांचा वापर दिशादर्शक आहे. यु ट्यूब चा वापर, निबंध, नाट्य, चित्रकला, चित्रपट अशा विविध माध्यमांचा कुशलतेने उपयोग हे यावेळच्या विचारवेध संमेलनांचे आकर्षण होते. या संमेलनांमधील तरुणांचा सहभाग त्यामुळेच लक्षात येणारा होता.

संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्ये येथे लक्षात घेण्यासारखे आहे. हे विचारपीठ फक्त व्यापक वैचारिक प्रबोधनाचे काम करणार असून   कोणत्याही थेट संघर्षात्मक अथवा रचनात्मक कामात सहभागी होणार नाही. या विचारपीठावरील विचार, कल्पना यांच्या घुसळणीतून प्रेरणा घेऊन जर कुणाला कोणतेही संघर्षात्मक अथवा रचनात्मक काम करावेसे वाटले तर ते व्यक्तिगत पातळीवर अशीकामे करतील.

विचारवेधच्या आयोजकांनी स्वीकारलेले धोरण योग्य की अयोग्य यावर चर्चा आणि मतभेद होऊनही ही भूमिका स्पष्टपणे एक धोरणात्मक निर्णय घेते हे स्वागतार्ह्य आहे. यातून कोणता संघर्षात्मक अथवा रचनात्मक कार्यक्रम हाती घ्यायचा हा वाद करत व्यापक प्रबोधनाच्या कामाला खीळ बसू न देण्याचा हेतू निश्चितच साध्य होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा