२२ मार्च २०१७

चिकित्सक बुद्धीने विचार करण्याची दृष्टी काळाच्या पडद्याआड


राजकीय, आर्थिक वा सामाजिक प्रश्नांचा विचार चिकित्सक बुद्धीने करण्याची दृष्टी महत्वाची आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रीय चळवळ यांचा विचारही भावनात्मक दृष्टीने न करता, जो पुरावा उपलब्ध होईल त्याच्या आधारे मोकळ्या मनाने करावा...


आज सकाळी कॉलेजला जाण्यासाठी निघालो तेव्हा माझ्या एका मित्राचा  फोन आला आणि गोविंद तळवलकर कोण ? असे विचारत होता. आपल्याला विद्यापीठात भेटले तेच का ते ? असे विचारत होता. पण विद्यापीठात भेटले ते वेगळे, तळवलकर नाही असे मी त्याला सांगितले. त्यावेळी त्याने असेही विचारले की "सत्तांतर" हे त्यांनीच लिहिलेले आहे ना ? पण माझ्या माहितीत आणि वाचनात जे "सत्तांतर" आले होते ते होते व्यंकटेश माडगूळकरांचे. त्यामुळे मी त्या पुस्तकाचे लेखक ते नाही असेच सांगितले आणि आमचा संवाद थांबला. जेव्हा मी कॉलेजमध्ये आलो तेव्हा समजले की तळवलकरांचा मृत्यू झाला. त्यावेळी मराठी वृत्तपत्राच्या विश्वातील अग्रलेखासाठी प्रसिद्ध असलेला संपादक कालवश झाला एवढी मर्यादित भावना आली.

खर तर या क्षणा अगोदर मी साधना मासिकातून त्यांचे काही लेख वाचले होते. तसेच वैचारिक वाचनाची आवड असल्याने तशी पुस्तके चालण्याची सवयही होती. त्यातूनच साधनाच्या पुस्तक स्टॉल वर त्यांचे वैचारिक व्यासपीठे हे पुस्तक फक्त चाळले होते, पण आर्थिक अडचणीमुळे फार पुस्तके विकत घेणे शक्य नसायचे. त्यामुळे ते विकत घेऊन वाचणे राहून गेले होते. त्यानंतर पुढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या (रानडे इन्स्टिटयूट) पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. "संपादन" हा विषय शिकवणाऱ्या प्रा. सुभाष नाईक सरांनी अग्रलेखाच्या अनुषंगाने गोविंद तळवलकरांचा अनेकदा उल्लेख केला. अग्रलेखाची भाषा, विषय निवड, मांडणीतील व्यासंग, परखडपणा अशा अनेक वैशिष्ट्यांबाबत तळवलकरांचे उदाहरण ते नेहमी द्यायचे. मराठी पत्रकारितेतील या पत्रकाराची त्यापुढील माहिती मात्र घेण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकली नाही. पण आज त्यांच्या भौतिक पातळीवर नसल्याच्या भावनेने त्यांच्याविषयी जाणून घेण्याची प्रखरतेने इच्छा झाली. तसेच पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या या गाजलेल्या संपादकाविषयी अगोदर जरी माहिती घेतली नाही, तरी किमान त्यांच्या जाण्यानंतर त्यांना समजून घ्यावे असेही वाटले. म्हणूनच गूगलवर त्यांच्याविषयी शोध घेतला. या शोधात पुढे आलेल्या बातम्या आणि लेख वाचताना एक वेगळेपण प्रकर्षाने जाणवले ते म्हणजे त्यांच्या मृत्यूची बातमी ही बहुतांशी सर्वच मराठी वृत्तपत्रात (ऑनलाइन) आलेली होती. मराठी वृत्तपत्रांच्या टोकाच्या स्पर्धेच्या काळात दुसऱ्या एखाद्या वर्तमान पत्राच्या संपादकाच्या मृत्यूची बातमी देणे अनेकदा टाळले जाते. पण त्या गृहीतकाला छेद देऊन त्या घटनेची दखल त्यांच्या कामाच्या विस्तृत तपशिलासह घेतली गेली. यातून त्यांची कामाची ताकद लक्षात आली.


दुसरी नोंदवावी अशी एक बाब म्हणजे त्यांनी लिहिलेल्या कोणत्याही पुस्तकाचे वाचन झाले नव्हते. त्यात सकाळी मित्राने "सत्तांतर त्यांनीच लिहिले आहे का ? अशी विचारणा केल्याने त्यांच्या पुस्तकांचीही माहिती घेतली. "सत्तांतर" या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची काही मोजकी पाने बुकगंगा या वेबसाईटवर वाचायला मिळाली. यात सुरुवातीला एक निवेदन आहे. त्यात त्यांनी तो ग्रंथ मानवेंद्रनाथ रॉय यांच्या स्मृतीस अर्पण करण्याचे कारण सांगितले आहे. त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांपासून त्यांनी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या साहित्याचे आणि विचाराचे आकर्षित होऊन वाचन केले. त्या वाचनामुळे राजकीय, आर्थिक वा सामाजिक प्रश्नांचा विचार चिकित्सक बुद्धीने करण्याची दृष्टी त्यांना प्राप्त झाली. राष्ट्रवाद, राष्ट्रीय चळवळ यांचा विचारही भावनात्मक दृष्टीने न करता, जो पुरावा उपलब्ध होईल त्याच्या आधारे मोकळ्या मनाने करावा असे म्हटले.  ही वृत्ती त्यांना मानवेंद्रनाथ रॉय यांच्याच लेखनातून मिळाल्याचे ते नमूद करतात. यात चिकित्सेच्या दृष्टिकोनात खूप महत्वाचे मूल्य ते सांगून जातात.

 गोविंद तळवलकर यांना आदरांजली देण्यासाठी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाने आदरांजली सभेचे नियोजन केले होते. त्यात अनेक मान्यवर पत्रकार सहभागी झाले होते. त्या सर्वांनीच त्यांच्या स्मरणातील तळवलकरांच्या आठवणी व्यक्त केल्या. त्या सर्वच आठवणी पुस्तका व्यतिरिक्तचे तळवलकर उलगडून सांगणाऱ्या होत्या.

त्यांच्या जाण्याला आदरांजली म्हणून त्यांच्या चिकित्सक बुद्धीने विचार करण्याची दृष्टी संपादन करण्याचा आणि त्यांना आणखी समजून घेण्याचा संकल्प करून मी त्यांना आदरांजली अर्पण करतो.

२१ मार्च २०१७

बोलके मोर्चे निघण्याची गरज ...




मराठा मोर्च्यांच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिघ अ‍ॅट्रॉसिटीच्या चर्चेने गाजत आहे. त्याअनुषंगाने जेष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची ’'माध्यम’'साठी घेतलेल्या मुलाखतीचे शब्दांकन ...


अ‍ॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्याच्या गैरवापराची चर्चा सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात छेडण्यात आली आहे. या सर्व चर्चेत एक महत्त्वाचा मुद्दाही समोर आला होता, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरउपयोग हा दलितांकडून होत नसून मराठ्यांमधीलच परस्परविरोधी दोन गटांकडून होतो, असं मत राज्यातील अनेक मराठा नेत्यांनी नोंदविलं आहे. त्यात शरद पवारानींही सूर मिसळला होता.  दलित समाजातील तरूणांना आमिष दाखवून विरोधकांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्यास सांगितले जाते.

अ‍ॅट्रॉसिटीचा दुरुपयोग दलित करीत नसून मराठा राजकारणीच करत आहेत. मुळात एक बाब इथं लक्षात घेण्याची गरज आहे, ती म्हणजे सदर कायदा रद्द करण्याचा अधिकार कोणत्याच राज्य सरकारला नाही. त्यामुळं किमान राज्य शासनाने तो सक्षम आणि निरपेक्ष पद्धतीने राबविण्याचा प्रयत्न करायला हवा. जर कायद्याचा गैरवापर होत असेल तर त्याचा एकच अर्थ निघू शकतो तो म्हणजे इथली यंत्रणा तो कायदा राबवायला सक्षम नाही.  या विषयासंदर्भात मी शरद पवार यांच्याशी जो संवाद साधला, त्यावेळी मी त्यांना त्यांनी माध्यमातून मांडलेली सदर भूमिका मराठा मोर्च्याच्या समोर जाऊन मांडावी असं सूचविलं होतं. पण शरद पवारांनी तसं काही केलं नाही. कारण एखाद्या गोष्टीचं पिल्लू सोडून, त्याभोवती फिरत राजकारण पाहत, तोंडाची गुळणी धरूण बसण्याची पवारांची खोड जुनीच आहे. त्यामुळं ते त्यांच्या फायद्याचं जिकडं असेल तिकडे जात असतात. जर शरद पवारांना खरंच हा वाद वाढू द्यायचा नव्हता तर त्यांनी खुलेपणाने भूमिका घेणं गरजेचं होतं.
         
माझ्या मते, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर हा दलितांमुळं होत नसून, कायद्याच्या फालतू अंमलबजावणीमुळे होतोय. पोलिसांना पैसे हवे असतात, त्यामुळं दोष नसणार्‍या माणसाला अटक केली जाते आणि त्याच्याकडून आणि गुन्हा नोंदविणार्‍यांकडूनही पैसे उकळले जातात आणि नंतर सोडून देतात.
         
कोणत्याही मानवी समाजात परिवर्तन हे अपरिहार्य आहे. सामंतशाहीनंतर भांडवलशाही येणार याविषयी कोणीच्याही मनात शंका असता कामा नये. सामंतशाहीला पहिला धक्का भांडवलशाहीच देणार हे नाकारता येणार नाही. जागतिकीकरणाने तर तो दिलाच आहे. आत्ता मराठा समाजाचा जो उद्रेक दिसतोय ते त्याचेच लक्षण आहे.
         
एकीकडे अण्णा हजारे यांचं जे गाव स्वयंपूर्ण करण्याचे स्वप्न आहे ते अर्थातच सांमतशाही टिकविण्याचे त्यांचे शेवटचे अस्त्र आहे. प्रेमसंबंध कौटुंबिक विरोधामुळे अयशस्वी झाल्याने मुली आत्महत्या करतात, अनेक घरचेच त्यांची हत्या करतात किंवा आजही करतात. तर दुसरीकडे आमचा शिकलेला तरुण - तरूणी मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह करीत आहेत. त्यामुळं जातीसंस्था शेवटच्या घटका मोजत आहे.
          
मी चाळीस वर्षे शिक्षण क्षेत्रात होतो. चाळीस वर्षांपूर्वी जी खेड्यातील गरीबाची मुलगी होती, ती आज तशी नाही. एका अर्थाने त्या मुलींमध्ये जैविकदृष्टीने फरक जाणवतोय. या मुला - मुलींची साधी मागणी आहे कि, आम्हांला आमच्या पसंतीचा जीवनसाथी पाहिजे. तो जातीतला असला तरी चालेल, जातीबाहेरचा असला तरी चालेल. त्यांना स्वतःचे आत्मभान आलेले आहे आणि त्यांना त्यांचे भविष्य दिसतंय. अशा परिस्थितीमध्ये जर त्यांनी आवडीचा जोडीदार निवडण्याची मागणी केली तर त्यात चूक काय आहे ? समाजाने ते कितीही दाबले तरी आता त्यांच्या भावनानां आवर घालणं अशक्य आहे. हा बदल आता अटळ आहे. त्यांना विरोध केला तर अनेक मुलं -  मुली पळून जातील. तुम्ही त्यांच्या हत्या केल्या तरी त्यातून काहीही होणार नाही. आणि त्यातल्या त्यात जातीव्यवस्था तर टिकून राहणारच नाही. उलट तुमची मुलगी फक्त जाईल, यापलीकडे काहीही होणार नाही. पण ही प्रकि‘या आता थांबणे नाही. कारण भांडवलशाहीने जातीत वर्ग तयार केले आहेत. या वर्गातील मुलामुलींचे लग्न होणे अटळ आहे, हे कुणीही थांबवू शकणार नाही.
          
बाबासाहेब आंबेडकर यांनी 1936 साली लिहिलेल्या ’अ‍ॅनहिलेशन ऑफ कास्ट’ या ग्रंथात सांगितले होते कि, या देशाचे भविष्यातील जातीचे प्रश्र मिटवायचे असतील तर मुला मुलींना प्रेम विवाह करण्यास प्रोत्साहन द्या, मग तो प्रेम विवाह जातीतील असो अथवा आंतरजातीतील असो, पण तो प्रेमातून झाला पाहिज. कारण प्रेम हे निसर्गाने फक्त माणसालाच दिले आहे. ज्या मनुष्याच्या अंतःकरणात कायम प्रिय व्यक्ती असेल तर तो इतर कुठल्याही स्त्रीकडे बघताना वासनेच्या नजरेतून पाहणार नाही. त्यामुळे तो कधीही बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार नाही आणि बलात्कारही करू देणार नाही. हीच बाब स्त्रियांच्या बाबतीतही आहे.
         
सध्या महाराष्ट्रात होत असलेल्या स्त्री अत्याचारांकडे जातीय अंगाने बघणे हे राजकारण आहे. हा मुद्दा पुढे करून जर मराठा समाज संघटित होणार असेल आणि त्यातून मराठ्यांची गेलेली पत सुधारणार असेल आणि त्यातून जर सत्ता येणार असेल तर मराठा समाजातील प्रस्थापित राजकारणी आंदोलनाचा असाच वापर करणार. बलात्कारपिडीत ती मुलगी फक्त मराठा नसून ती एक स्त्री देखील आहे.
         
प्रत्येक गोष्टीचा पुनर्विचार करण्याची गरज असते. कालबाह्य गोष्ट टाकून द्यायला हवी, त्यात सुधारणा करायला हवी किंवा ती गोष्ट काढून त्याला चांगला कालानुसंगे पर्याय आणला पाहिजे. अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा हा सामाजिक लोकशाहीसाठी आहे, तो आर्थिक लोकशाहीसाठी नाही.
         
आर्थिक लोकशाही आणण्यासाठी गरिब मराठ्यांनी उठलेच पाहिजे. अ‍ॅट्रॉसिटी हा विषय त्यांच्या संघर्षाच्या वाटेत अडसर ठरू शकतो, कारण या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवण्यात मराठा समाजातीलच प्रस्थापित राजकारण्यांचे हित आहे. मी या मोर्च्यांचे स्वागत करतो, कारण त्यांना अनेक गोष्टींची कल्पना येणे बाकी आहे.
         
या मूक मोर्च्यांच्या ऐवजी आता बोलके मोर्चे निघायला हवेत. तरुण - तरुणींनी विचारायला हवं की, त्यांचे खरे शत्रू कोण आहेत ? राजकारणी त्या प्रश्‍नांनाही घाबरतात म्हणून हे मोर्चे मूक आहेत. ही तरुण मुलं - मुली बोलायला लागली तर सर्व पक्षाचे सत्ताधारी पळून जातील.
         
तेरा - चौदा वर्षाच्या मुलींना ज्यांना मूळ प्रश्‍नांची जाण यायची बाकी आहे त्यांना बोलायला लावण्यात काय अर्थ आहे ? महाविद्यालयातील आणि त्यानंतर बेरोजगारीला सामोरं जावं लागणार्‍या तरुणांना बोलायला लावलं पाहिजे . मला हे मोर्चे महत्त्वाचेवाटतात,  कारण मराठा तरुण किमान विचार करायला लागला आहे. तो आतापर्यंत फक्त जातीचा आणि क्षत्रियत्वाचा विचार करत होता. आता तो आरक्षण मागतो आहे हा मोठा बदल आहे. यातून त्यांना कळेल की,  आपलं खरं शोषण कोण करत आहे ?

http://maadhyam2016.blogspot.com/2016/10/blog-post.html?spref=bl



०७ मार्च २०१७

स्तन आणि गर्भाशय नसलेली स्त्री ही स्त्री असू शकते का ?


                                                             एरिन ब्रोकोविच (चित्रपट)


"स्तन आणि गर्भाशय नसलेली स्त्री ही स्त्री असू शकते का ?" हा प्रश्न प्रचलित स्त्री असण्याच्या सर्वच संकल्पनांना धक्का देतो आणि त्या स्त्रीचे स्त्री असण्यापलीकडचे माणूसपण अधोरेखित करतो.



१४ मार्च २००० रोजी अमेरिकेत प्रदर्शित झालेला हा चित्रपट कॅलिफोर्नियामधील एका सत्य घटनेवर आधारित आहे. एक बेरोजगार आई (एरिन ब्रोकोविच) स्वतःच्या कष्टाने आणि गुणवत्तेच्या आधारावर आपल्या कामाचा ठसा उमटवते. कायद्याची प्रचलित कोणतीही पार्श्वभूमी आणि डिग्री नसतानाही संशोधक वृत्ती आणि कामाबद्दलची आत्मीयता याच्या बळावर एका वकिलाच्या कार्यालयात कायदेशीर कामात सहाय्यक बनते. त्यामाध्यमातून कॅलिफोर्नियातील असंख्य लोकांना ती न्याय मिळवून देते. "पॅसिफिक गॅस अँड इलेक्ट्रिक कंपनी ऑफ कॅलिफोर्निया" या कंपनीच्या प्रकल्पामुळे तेथील भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण होऊन पाण्यात हेक्सावॅलेन्ट क्रोमिअमचे घटक मोठ्या प्रमाणात सोडले गेले. त्याचा परिणाम म्हणून तेथील स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर आजारांनी ग्रासले. अनेक लहान मुले, वृद्ध आणि तरुण स्त्री पुरुषांचा त्यात मृत्यूही झाला. १९९३ सालच्या वास्तविक घटनेवर आधारित हा चित्रपट त्या घटनांमध्ये वैश्विक पातळीवरील स्त्री जीवन दर्शकांसमोर ठेवतो. हा चित्रपट बघताना एक महत्वाची बाब लक्षात येते ती म्हणजे, "सर्वसामान्यपणे स्त्री जीवनाविषयी आणि त्यातही आई म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या पेलताना होणारी स्त्रीची  ससेहोलपट आणि खडतर प्रवास हा फक्त भारतीय परिप्रेक्ष्यापुरता मर्यादित नाही. तो शोषणाचा आणि पिळवणुकीचा अनुभवही वैश्विक आहे. पाश्चिमात्य जगातही मुक्त जीवनाच्या वाटेवर जगताना जबाबदाऱ्यांचे ओझे हे तेथील स्त्रीवरच येते. असे होत असतानाही या जबाबदाऱ्यांना तोंड देत नोकरीसाठी आटापिटा करत नोकरी मिळवून कामाच्या ठिकाणी स्वतःच्या कामातून समाजात स्वतःचे स्थान संवेदनशीलपणे निर्माण केले.

एरिनचे ऐन उमेदीच्या काळात लग्न झाले आणि त्यामुळे जे काम करत होती तेही मध्येच सुटले. मध्यंतरीच्या मोठ्या काळाचे अंतर आणि नंतर आई म्हणून तीन मुलांच्या जबाबदारीसह इराणचा घटस्फोट होतो. यापुढेच सुरु होते या चित्रपटाची खरी कथा.

चित्रपटाची वैशिट्ये म्हणजे, संपूर्ण चित्रपट कोठेही संगीताचा अथवा पार्श्वसंगीताचा भडीमार करत नाही. अनेक  चित्रपटांत काल्पनिकता आणि अतिशयोक्ती करत मांडणी होते, पण या चित्रपटात तसे काहीही आढळत नाही. अगदी साधेपणाने दैनंदिन जगण्यातील ठिकाणे आणि प्रसंग अर्थपूर्ण पद्धतीने मांडलेली दिसतात. ती घालत असलेल्या कपड्यांवर कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून जो आक्षेप घेतला जातो तो समाजाचा आरसा दाखवतो. तर उलटप्रश्नी सहकाऱ्याला त्याच्या वेशभूषेत (टाय घालू नये) बदल करण्यास सांगताना समाजाचा दुटप्पी चेहराही समोर येतो. अनेकदा स्त्रियांना आजूबाजूला असलेल्या वातावरणामुळे असेच वाटू लागते की मी काही करू शकणार नाही, मला काहीही काम करता येत नाही. त्यातून महिला आणखी मागे राहतात. तशीच स्थिती एरिन या महिलेच्या रूपाने या चित्रपटात दाखवली आहे, पण फरक एवढाच आहे की एरिन फक्त तेवढ्यावरच थांबत नाही तर त्या परिस्थितीशी संघर्ष करते. हा संघर्ष पुढे सर्वच गृहीतके मोडीत काढत अमेरिकेच्या सामाजिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरतो. आजपर्यंतच्या सर्वात जास्त मोबदला मिळवून देणारी कायदेशीर लढाई एरिनच्या कामातून उभी राहते आणि यशस्वी होते.

पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून हा चित्रपट बघताना काही वेगळे दृष्टिकोनही समोर आले. एरिन या सामान्य स्त्रीने ज्या असामान्यपणे तिच्या कामाच्या संबंधाने घटनास्थळांवर जाऊन संशोधन केले आणि पुरावे मिळवले ते "शोध पत्रकारितेला" प्रोत्साहन देणारे होते. त्या प्रकल्पाच्या प्रदूषणाने गंभीर आजारी पडलेल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एरिनही मोठ्या काळापासून त्या प्रदूषणात काम करत असते आणि त्यामुळे तीही काही प्रमाणात आजारी पडलेली असते. हे सर्व दाखवण्यासाठी चित्रपट एरिनचा एका आजारी मुलीशी संवाद दाखवला आहे, ज्यात त्या लहान मुलीच्या चेहऱ्यावर आजारपणाचे स्पष्ट संकेत दिसत असतात. पण कॅमेरा जेव्हा विरुद्ध दिशेला बसलेल्या एरिनच्या चेहऱ्यावर येतो तेव्हा ते दृश्य त्या मुलीच्या स्थितीत आणि एरिनच्या स्थितीत खूप काही साम्य असल्याचे सुचवितो. कॅन्सर आणि इतर आजाराने शस्त्रक्रिया करायला लागलेली महिला एरिनला विचारते की "स्तन आणि गर्भाशय नसलेली स्त्री ही स्त्री असू शकते का ?" हा प्रश्न प्रचलित स्त्री असण्याच्या सर्वच संकल्पनांना धक्का देतो आणि त्या स्त्रीचे स्त्री असण्यापलीकडचे माणूसपण अधोरेखित करतो.

एका बलाढ्य कंपनीविरोधात असलेले हे काम थांबण्यासाठी एरिनला आर्थिक अमिषापासून तर अगदी जीवे मारण्याच्या धमक्यांपर्यंत प्रकार होतात तरी एरिन थांबत नाही कारण ती या घटनांकडे माणूस म्हणून बघत असते. या माणूसपणाचे दर्शन तिच्या दोन महिला वकिलांसोबतच्या संवादात स्पष्टपणे दिसते. एरिन ज्या केसवर काम करत असते त्या संबंधित प्रत्येक व्यक्तीशी तिचे व्यक्तिगत नाते तयार झालेले असते. त्या प्रत्येकाची इतंभूत माहिती तिला तोंड पाठ असते, पण तरीही तिच्या सोबत काम करणाऱ्या वरिष्ठ महिला वकिलाकडून तिच्याशी वाईट वागणूक होते. पण एरिन तिला सडेतोडपणे उत्तर देते.

दुसऱ्या एका प्रसंगात प्रकरण मिटवण्यासाठी आलेल्या महिला वकिलाच्या पैशाच्या भाषेतील मांडणीला एरिन खूप चपखलपणे स्त्री जीवनाच्या अंगाने खोडते आणि तिला वास्तवाची जाणीव करून देत. वकिलाच्या भूमिकेतील त्या महिलेला महिला प्रश्नांवर जागे करते. खरतर स्त्री जीवन हे कौटुंबिक दृष्टिकोनातून खूपच संवेदनशील आहे. ही संवेदनशीलता खूप सकारात्मक पद्धतीने या चित्रपटात मांडली आहे.

कामानिमित्त नेहमी घराबाहेर राहायला लागल्यामुळे एरिनच्या अगदी लहान वयातील मुलांना आईचा सहवास मिळत नाही. त्यातून एरिनचा ८ वर्षाचा मुलगा तिच्यावर नाराज होतो. एरिनच्या मनात हा प्रश्न पडतो की, "मी जे महत्वाचे आम करते आहे हे माझ्या मुलांना कधी समजेल ? ज्यामुळे  ते नाराज होणार नाही ?" आई म्हणून हा प्रसंग आणि एकूणच स्थिती तिची कसोटी बघणारी ठरते. पण कामाचे गांभीर्य तिला काम सुरु ठेवण्यास मदत करते. पुढे तिचा तोच मुलगा जो आईला रात्र रात्र काही कागदपत्रे वाचत असलेली बघतो आणि ती कागदपत्रे वाचून आईला विचारतो की "या ठिकाणी उल्लेख असलेल्या मुलीचे वयही माझ्या एवढेच आहे आणि ती आजारी आहे ना ?" त्यावर आई त्याला म्हणते "हो, मी तिलाच मदत करते आहे." त्यावर तो मुलगा पुन्हा म्हणतो की मग तिची आई तिला का मदत करत नाही ?" "तिची आई देखील आजारी आहे" हे समजल्या नंतर त्या मुलाच्या वागण्यात जो बदल होतो तो खूप काही सांगून जातो. त्या संवेदनशील बदलाचे समाधान एरिनच्या चेहऱ्यावर खूप प्रभावीपणे दिसतात. आयुष्यात एकटी असलेली एरिन नव्याने झालेल्या मित्राच्या मदतीमुळे जास्त वेळ काम करू शकली पण शेवटी तोही जेव्हा सोडून जाण्याचा निर्णय घेतो. तेव्हा मात्र एरिन एकूणच पुरुषी मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. यावर तिचा मित्र "मी इतरांसारखा  नाही यासाठी काय करायला हवे ?" असे विचारतो तेव्हा एरिन खूप खंबीरपणे स्पष्ट सांगते की "अश्या स्थितीत तू येथेच थांब इतरांसारखा निघून जाऊ नको." हा प्रसंग अनेक महिलांना कणखरपणे भूमिका घ्यायला प्रेरणा देतो. कालांतराने पुन्हा तो मित्र आणि ती एकत्र येतात. या मित्राला आपण एवढे दिवस काय करत होतो हे दाखवण्यासाठी त्या समस्याग्रस्त स्थानिकांच्या भेटीला नेते तेव्हा त्या सर्व लोकांच्या चेहऱ्यावरील न्याय मिळाल्याचे समाधान एरिनच्या मित्राचे अनेक प्रश्न निकाली काढते.

अशा पद्धतीने "एरिन ब्रोकोविच" हा चित्रपट दर्शकांना चित्रपट कसे असतात आणि कसे असावेत हे बघण्याची दृष्टी तर देतोच पण भारतीय चित्रपट सृष्टीत वास्तवाला भिडणाऱ्या चित्रपटांची उणीव देखील तीव्रपणे अधोरेखित करतो.




एरिन ब्रोकोविच