२३ ऑक्टोबर २०१७

सिक्रेट सुपरस्टार: ड्रीम देखणा तो बेसिक होता है

'सिक्रेट सुपरस्टार' हा प्रत्येक मुलीने आपल्या आईसोबत बघायलाच हवा असा चित्रपट आहे. तसेच मुलांनी बहिणीसोबत आणि हो मैत्रिणीसोबत बघावा असाही आहे.

आईमधील आणि मुलीमधील नात्याची एक सुंदर, हळवी आणि संवेदनशील गुंफण चित्रपटात ठिकठिकाणी पाहायला मिळते. ही आई मुलीला एक संघर्षमय परिस्थितीत जन्म तर देतेच पण तेवढ्यावरच न थांबता मुलीला स्वप्नही बघण्याचा अवकाश देते. मुलीच्या जन्मासाठी सुरू केलेला संघर्ष पुढे मुलीला दाखवलेल्या स्वप्नांच्या पूर्णत्वापर्यंत कसा होतो हा एक महत्वाचा प्रवास म्हणजे या चित्रपटाचा मुळ गाभा आहे.
(आई-नजमा, मुलगी-इनसिया म्हणजे औरत/बाई)


हा चित्रपट जीवनाचे कोणतेही न पेलवणारे तत्वज्ञान आपल्याला अजिबात सांगत नाही. परंतु तो जगताना स्वप्न पाहण्याची आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मात्र जरूर देतो. ही प्रेरणा म्हणजे सहज न लक्षात येणारी बंडखोरीची अतिसूक्ष्म बीजेच आहे. ज्यात विशेष असे काहीच वाटत नाही, परंतु जेव्हा त्या बीजाला विचारांच्या जमिनीत रुजल्यानंतर अंकुर फुटतात तेव्हा सुरू होतो सामान्य व्यक्तीचा (येथे आईचा आणि मुलीचा) असामान्य प्रवास.

यासोबतच हा चित्रपट मॉडर्न कॉलनीमध्ये राहणाऱ्या जुनाट आणि कुजक्या विचारांच्या मानसिकतेला छेद देण्याचाही प्रवास आहे. घरात होणाऱ्या हिंसाचाराचा आपल्या मुलांवर वाईट परिणाम व्हायला नको म्हणून खोटं बोलण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारी संवेदनशील आई जशी येथे दिसते, तसाच छोट्या छोट्या गोष्टींसाठी बायकोवर हात उगारणारा हिंस्र बापही यात दिसतो. यात तो आपल्या मुलावर (फक्त मुलावर, मुलीवर नाही) मारहाणीचा वाईट परिणाम होऊ नये असा दिखाऊपणा देखील करताना दिसतो.


'सिक्रेट सुपरस्टार' मध्ये प्रतीक म्हणून जरी मुस्लिम समाजाचे उदाहरण घेतले असले तरी त्यात बघायला मिळालेली परिस्थिती थोड्याफार फरकाने सर्वच समाजात आहे. मग सुरू होतो त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा आणि परिस्थितीचे उत्तर शोधणारा मुलीचा आणि तिच्या आईचा प्रवास. या प्रवासाला सुरुवात होण्याची बीजे त्या मुलीच्या जन्मापासून तर रुजायला सुरुवात होतेच, पण त्याला खरे अंकुर फुटतात ते आईने तिच्या हातात वयाच्या सहाव्या वर्षी गिटार आणून दिल्यानंतर.

स्वयंपाक बनवताना भाजीत मीठ कमी पडणे अथवा ते टाकायला विसरणे ही अगदीच सामान्य आणि फक्त सामान्य नाही तर वैश्विक सामान्य गोष्ट आहे. परंतु  तरीही या वैश्विक सामान्य गोष्टीला दिला जाणारा प्रतिसाद हा पुरुषा पुरुषांप्रमाणे बदलतो. तरीही कोणतीही व्यक्ती अधिक तणावपूर्ण वातावरणात जगत असेल तर त्या व्यक्तीच्या बाबतीत विसरण्याचे प्रमाण अधिक अनुभवायला मिळते. त्यात घरातील एखादी व्यक्ती (येथे नवरा) हिंसक असेल आणि घरातील वातावरण नेहमीच दहशतीचे असेल तर जास्तच अनुभवायला मिळते. मग हा प्रवास फक्त भाजीत मीठ टाकायला विसरणे येथपर्यंत न राहता दैनंदिन जगण्याच्या अनेक गोष्टींमध्ये दिसू लागतो. याचे अधिक योग्य विश्लेषण मनोविश्लेषक उत्तम पद्धतीने करतील. येथे मुद्दा एवढंच आहे की, घरातील छोट्या छोट्या अनियमितेंमध्ये बायकोला मारझोड करणाऱ्या व्यक्ती (येथे पुरुष) तेवढ्यावरच थांबत नाही. तर आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्याचेही नियंत्रण आणि नियमन करायला सुरुवात करते. ते कसे हे 'सिक्रेट सुपरस्टार' हा चित्रपट दर्शकाला दाखवतो.

या चित्रपटाची आणखी एक विशेष बाब म्हणजे रियालिटी शो पासून दूर राहणारा आणि पुरस्कार कार्यक्रमांना टाळणारा आमीर खान यात शक्ती कपूर या त्याच्या मुळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध असणाऱ्या व्यक्तीची भुमिका साकारत आहे. त्याला खुप कालावधीनंतर अशा भुमिकेत बघणे खुपच उत्सुकतापूर्ण आहे. शक्ती कपुर कोण आहे, कसा आहे या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपण चित्रपट गृहांपर्यंत आवर्जुन जा. त्यात लक्षात घेण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे शक्ती कपुरच्या व्यक्ती चित्रातून त्या पद्धतीच्या वास्तव जगातील व्यक्तीमत्वांना लगावलेली चपराक. खूप काही आव आणून जगणाऱ्यांचे समर्पक चित्रण या व्यक्तिरेखेत बघायला मिळते. पण त्यामुळे त्या व्यक्तीला फक्त पांढरं किंवा काळं अश्या दृष्टीने बघून खलनायक बनवले जात नाही. तर त्याच्यातील गुणवत्तेला आणि संवेदनशील माणसाला देखील समोर आणले जाते.


चित्रपटात आणखी दोन व्यक्तिरेखा देखील दर्शकाचे मन जिंकून घेतात. एक म्हणजे 'सिक्रेट सुपरस्टारचा (इनसियाचा) मित्र (चिंतन). हा मित्र चित्रपट संपेपर्यंत अनेक पातळ्यांवर आपली छाप सोडतो. आणि दुसरा मुलीचा छोटा भाऊ. हा छोटा भाऊ म्हणजे आई आणि मुलीच्या आयुष्यातला एक निरागस पुरुष. परंतु त्याचे ते निरागसपण टिकेल की तोही वडीलांसारखा होईल याचीही काळजी आई करत असते. ते कसं हे चित्रपट बघताना नक्की समजेलच.

म्हणूनच सामान्यातल्या सामान्य माणसाला समजेल आणि त्यांच्यातही सकारत्मक बदलाची बीजे पेरेल अशा या चित्रपटाला आवर्जून चित्रपटगृहात जाऊन बघा.
(खरंतर चित्रपटातील काही प्रसंग घेऊन त्याच्याविषयी मत व्यक्त करावेसे वाटले होते पण नंतर ते रद्द केले. कारण चित्रपटातील प्रसंग सांगुन चित्रपट पाहताना तुमच्या मनात उमटणाऱ्या स्वाभाविक प्रतिक्रियांना आणि विचारांना असे केल्याने मर्यादित केल्यासारखे होईल.)

#AamirKhan #SecretSuperstar #आमिर_खान #सिक्रेट_सुपरस्टार


  
The way My these two new friends from Hyderabad were enjoying the film with lots of curiosity and respect was really appreciable. That time I feel that while watching movie #SecretSuperstar , they and me were at the same ground of emotions and thoughts. That's why I feel respect for them.

One more thing that they are a good human who can understand the innocent feelings and thoughts of life.

This reflection is directly connected with their response to film. Means they were understanding the massage of situations narrated in film which director wants to say.

१४ ऑक्टोबर २०१७

माणसातील माणूसपणाला साद घालणारे आणि नकळतपणे जाणवणाऱ्या भावनांना देखील शब्दांकित करणाऱ्या लेखकबद्दल...

माणसातील माणूसपणाला साद घालणारे आणि  नकळतपणे जाणवणाऱ्या भावनांना देखील शब्दांकित करणारे विद्वान लेखक डॉ. आ. ह. साळुंखे (तात्या) यांना जन्मदिनाच्या खुप खुप शुभेच्छा.




डॉ. आ. ह. साळुंखे यांचे पहिले पुस्तक माझ्या ओळखीचे झाले ते 'गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो' या पुस्तकाच्या माध्यमातून. खरंतर मी काही ते पुस्तक वाचलेही नव्हते, पण माझ्या गावाकडील एक मित्राने त्या पुस्तकाचा संदर्भ दिला होता. तो संदर्भ देताने त्या मित्राने एक विशिष्ट जात (ब्राम्हण) कशी वाईट असते हे मांडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जातीवरून ठरणाऱ्या चांगले वाईटपणावर माझा अजिबातच विश्वास नव्हता. जे काही थोडे वाचन व त्या वाचनामुळे स्वतःसोबतचा संवाद होता, त्यातून जन्माधिष्टीत चांगले वाईटपणावर माझा मुळीच विश्वास नव्हता. स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील जन्मधिष्टीत उच्चनीचतेला नाकारले होते आणि गांधींनी सर्वांना माणुसकीची शिकवण दिली होती ही पार्श्वभूमी देखील माहीत होतीच. राजेशाहीच्या काळात देखील शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात जातीवरून कुणाचीही गुणवत्ता ठरवली नव्हती. मात्र माझा हा मित्र 'बामसेफ' या जाती आधारीत राजकारण करणाऱ्या संघटनेच्या विचारांनी प्रभावित असल्याने तो असा विशिष्ट युक्तिवाद करत होता. अशापद्धतीने सुरुवातीलाच साळुंखे सरांच्या पुस्तकाचा संदर्भ खूपच नकारात्मक मांडणीची आला होता. या अनुभवाचा स्वाभाविक परिणाम माझ्यावर नकारात्मक झाला. पण साळुंखे सरांनी नेमके असे काय लिहिले आहे, ज्याचा  आधार घेऊन माझा हा मित्र जन्माने मिळणाऱ्या जाती आधारित उच्च निचतेचा समर्थक आहे हे समजून घेण्यासाठी मी त्यांची पुस्तके वाच्यायला सुरुवात केली.


डॉ. आ. ह. साळुंखे यांचे पुस्तक वाचताना सुरुवातीपासून एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येत होती, ती म्हणजे त्यांच्या लेखनात आणि एकूणच मांडणीत कोठेही आक्रस्ताळेपणाचा लवलेश देखील नव्हता. पण तरीही त्यांनी ऐतिहासिक सत्य म्हणुन हेही नोंदवले होते की त्या काळात विशिष्ट जाती समूहाच्या नेतृत्वाने जाती आधारित समाजाची विभागणी करून स्वतःला लाभ मिळवण्याचे यशस्वी प्रयत्न इतिहासात केले आहे . त्यात त्या काळी विशिष्ट जात समूहाचा उल्लेखनीय सहभाग होता. त्यांच्या याच नोंदीला घेऊन माझा बामसेफी मित्र आणि त्याच्यासारखेच इतर संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाचे मित्र सोयीस्करपणे साळुंखे सरांचा युक्तिवाद ब्राम्हण जातीविषयी द्वेष पसरवण्यासाठी करायचे. त्यामुळे मला असेही वाटायला लागले की, कोणत्याही लेखकाने त्याचे लेखन करताना त्याच्या लेखनाचा समाजात कसा वापर होतो आहे त्याविषयी सजग असायला हवे. तसेच जर कोणी या लेखनाचा वापर जातीय राजकारणासाठी करत असेल तर त्या लेखकाने त्या वापरला आक्षेप घ्यावे आणि त्यांची भूमिका अधिक सविस्तरपणे मांडावी.


मुळात माझे डॉ. साळुंखे सरांच्या लेखनाचे पुरेसे वाचन नव्हते आणि नुकतेच कोठे वाचायला सुरुवात केली होती, त्यात त्यांच्या लेखनाचा असे चुकीचे वापर अनुभवायला मिळत होते. त्यामुळे काही काळ काही पूर्वग्रह तयार झाले. मात्र जसे जसे मी त्यांचे लेखन सविस्तरपणे वाचू लागलो आणि अनेकांसोबत चर्चा देखील करू लागलो, तसे तसे त्यांच्याबद्दलचे पूर्वग्रह दूर झाले. साळुंखे सरांना समजून घेताना माझ्या एका खुप जवळच्या मित्राने ज्याचा माझ्या जडणघडणीत महत्वाचा वाट राहिला आहे, त्यानेही मोलाची माहिती दिली. त्या मित्रामुळे डॉ आ. ह. साळुंखे सरांना भेटण्याची संधी देखील मिळाली. त्या भेटीत अनेक शंकांचे समाधान झाले. पण त्यांच्या एकूणच लेखन साहित्याचे वाचन असणाऱ्या माणसाला त्याच्या मनातील बहुतांशी सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळतील एवढे नेमके आणि सकस लेखन साळुंखे सरांनी केले आहे. याची प्रचिती मला त्यांचे सर्व लेखन साहित्य वाचल्यानंतर आली.


साळुंखे सरांनी चळवळीतील कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेले 'मित्रांना शत्रू करू नका' आणि 'परिवर्तन शास्त्रही आणि कलाही' या पुस्तकांनी त्यांची कार्यपद्धती समजून घ्यायला खूपच मदत केली.  अत्यंत शांत आणि संयतपणे ते आपला एक एक मुद्दा मांडतात. हे मुद्दे मांडताना ते आपल्या मताचा प्रतिवाद करू शकणाऱ्या सर्वच मतांवर आपली तर्कसंगत आणि संदर्भांनी परिपूर्ण बाजू समोर ठेवतात. या प्रत्येक संदर्भांची मांडणी करतानाच साध्या साध्या उदाहरणांमधून आपले मुद्दे चफकलपणे समजावून सांगतात. ते वाचताना अगदी सामान्य पातळीवरचे ज्ञान असलेल्या, परंतु स्वतःचे असे स्वतंत्र विचार असणाऱ्या माणसाला ते पाटतात. ही त्यांच्या मांडणीची एक महत्वाची बाजू.


साळुंखे सरांच्या लेखनाची माझ्यासाठीची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांच्या लिखाणात आणि मांडणीत कधीही कडवटपणा, तिरस्कार, घृणा, द्वेष, शत्रुत्व, नामोहरम करणे, बदनामी करणे अशा भावनांना स्थान नसते. प्रत्येक माणसाचे माणूसपण मान्य करून त्याच्या विचारांची आणि कार्यपद्धतीची विधायक चिकित्सा करण्याची त्यांची लेखन पद्धती आहे. यात सर्वच जीवसृष्टीचे हित व्हावे हा विचार त्यांच्या केंद्रस्थानी असतो. परंतु तरीही ऐतिहासिक लेखन करताना ते समोर आलेल्या तथ्यांची योग्य दाखल घेऊन तटस्थपणाने चिकित्सा देखील करतात. यात वेगळे मत मांडणाऱ्याचे योग्य मुद्दे स्वीकारतात आणि चुकीचे मुद्दे नम्रपणाने खोडून काढतात. त्यांच्या या कामात ते कधीही व्यक्तिगत दोषारोप करत नाही. नम्रपणा हा त्यांचा स्थायीभाव असल्याने त्यांचे लेखन वाचनीय होते. तसेच त्यांना ऐकणे समृद्ध करणारे ठरते. विचारवंत, अभ्यासक, संशोधक व कार्यकर्ता म्हणून त्यांनी अनेक किचकट आणि गुंतागुंतीचे प्रश्न हाताळले आहेत. वैचारिक विश्वात त्यांच्या मांडणीला प्रचंड महत्व आहे. असे असतानाही त्यांचे सामन्यातील सामान्य माणसाशी एकरूप होऊन बोलणे, त्याची प्रेमाने विचारपूस करणे आणि अगदी त्याच्या व्यक्तिगत अडचणींविषयी हितगुज करण्याची त्यांची क्षमता एकमेवाद्वितीय आहे.
त्यांना जन्मदिनाच्या खुप खुप आरोग्यदायी आणि आनंदी शुभेच्छा.

प्रविण सिंधू