२२ मार्च २०१७

चिकित्सक बुद्धीने विचार करण्याची दृष्टी काळाच्या पडद्याआड


राजकीय, आर्थिक वा सामाजिक प्रश्नांचा विचार चिकित्सक बुद्धीने करण्याची दृष्टी महत्वाची आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रीय चळवळ यांचा विचारही भावनात्मक दृष्टीने न करता, जो पुरावा उपलब्ध होईल त्याच्या आधारे मोकळ्या मनाने करावा...


आज सकाळी कॉलेजला जाण्यासाठी निघालो तेव्हा माझ्या एका मित्राचा  फोन आला आणि गोविंद तळवलकर कोण ? असे विचारत होता. आपल्याला विद्यापीठात भेटले तेच का ते ? असे विचारत होता. पण विद्यापीठात भेटले ते वेगळे, तळवलकर नाही असे मी त्याला सांगितले. त्यावेळी त्याने असेही विचारले की "सत्तांतर" हे त्यांनीच लिहिलेले आहे ना ? पण माझ्या माहितीत आणि वाचनात जे "सत्तांतर" आले होते ते होते व्यंकटेश माडगूळकरांचे. त्यामुळे मी त्या पुस्तकाचे लेखक ते नाही असेच सांगितले आणि आमचा संवाद थांबला. जेव्हा मी कॉलेजमध्ये आलो तेव्हा समजले की तळवलकरांचा मृत्यू झाला. त्यावेळी मराठी वृत्तपत्राच्या विश्वातील अग्रलेखासाठी प्रसिद्ध असलेला संपादक कालवश झाला एवढी मर्यादित भावना आली.

खर तर या क्षणा अगोदर मी साधना मासिकातून त्यांचे काही लेख वाचले होते. तसेच वैचारिक वाचनाची आवड असल्याने तशी पुस्तके चालण्याची सवयही होती. त्यातूनच साधनाच्या पुस्तक स्टॉल वर त्यांचे वैचारिक व्यासपीठे हे पुस्तक फक्त चाळले होते, पण आर्थिक अडचणीमुळे फार पुस्तके विकत घेणे शक्य नसायचे. त्यामुळे ते विकत घेऊन वाचणे राहून गेले होते. त्यानंतर पुढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या (रानडे इन्स्टिटयूट) पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. "संपादन" हा विषय शिकवणाऱ्या प्रा. सुभाष नाईक सरांनी अग्रलेखाच्या अनुषंगाने गोविंद तळवलकरांचा अनेकदा उल्लेख केला. अग्रलेखाची भाषा, विषय निवड, मांडणीतील व्यासंग, परखडपणा अशा अनेक वैशिष्ट्यांबाबत तळवलकरांचे उदाहरण ते नेहमी द्यायचे. मराठी पत्रकारितेतील या पत्रकाराची त्यापुढील माहिती मात्र घेण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकली नाही. पण आज त्यांच्या भौतिक पातळीवर नसल्याच्या भावनेने त्यांच्याविषयी जाणून घेण्याची प्रखरतेने इच्छा झाली. तसेच पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या या गाजलेल्या संपादकाविषयी अगोदर जरी माहिती घेतली नाही, तरी किमान त्यांच्या जाण्यानंतर त्यांना समजून घ्यावे असेही वाटले. म्हणूनच गूगलवर त्यांच्याविषयी शोध घेतला. या शोधात पुढे आलेल्या बातम्या आणि लेख वाचताना एक वेगळेपण प्रकर्षाने जाणवले ते म्हणजे त्यांच्या मृत्यूची बातमी ही बहुतांशी सर्वच मराठी वृत्तपत्रात (ऑनलाइन) आलेली होती. मराठी वृत्तपत्रांच्या टोकाच्या स्पर्धेच्या काळात दुसऱ्या एखाद्या वर्तमान पत्राच्या संपादकाच्या मृत्यूची बातमी देणे अनेकदा टाळले जाते. पण त्या गृहीतकाला छेद देऊन त्या घटनेची दखल त्यांच्या कामाच्या विस्तृत तपशिलासह घेतली गेली. यातून त्यांची कामाची ताकद लक्षात आली.


दुसरी नोंदवावी अशी एक बाब म्हणजे त्यांनी लिहिलेल्या कोणत्याही पुस्तकाचे वाचन झाले नव्हते. त्यात सकाळी मित्राने "सत्तांतर त्यांनीच लिहिले आहे का ? अशी विचारणा केल्याने त्यांच्या पुस्तकांचीही माहिती घेतली. "सत्तांतर" या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची काही मोजकी पाने बुकगंगा या वेबसाईटवर वाचायला मिळाली. यात सुरुवातीला एक निवेदन आहे. त्यात त्यांनी तो ग्रंथ मानवेंद्रनाथ रॉय यांच्या स्मृतीस अर्पण करण्याचे कारण सांगितले आहे. त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांपासून त्यांनी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या साहित्याचे आणि विचाराचे आकर्षित होऊन वाचन केले. त्या वाचनामुळे राजकीय, आर्थिक वा सामाजिक प्रश्नांचा विचार चिकित्सक बुद्धीने करण्याची दृष्टी त्यांना प्राप्त झाली. राष्ट्रवाद, राष्ट्रीय चळवळ यांचा विचारही भावनात्मक दृष्टीने न करता, जो पुरावा उपलब्ध होईल त्याच्या आधारे मोकळ्या मनाने करावा असे म्हटले.  ही वृत्ती त्यांना मानवेंद्रनाथ रॉय यांच्याच लेखनातून मिळाल्याचे ते नमूद करतात. यात चिकित्सेच्या दृष्टिकोनात खूप महत्वाचे मूल्य ते सांगून जातात.

 गोविंद तळवलकर यांना आदरांजली देण्यासाठी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाने आदरांजली सभेचे नियोजन केले होते. त्यात अनेक मान्यवर पत्रकार सहभागी झाले होते. त्या सर्वांनीच त्यांच्या स्मरणातील तळवलकरांच्या आठवणी व्यक्त केल्या. त्या सर्वच आठवणी पुस्तका व्यतिरिक्तचे तळवलकर उलगडून सांगणाऱ्या होत्या.

त्यांच्या जाण्याला आदरांजली म्हणून त्यांच्या चिकित्सक बुद्धीने विचार करण्याची दृष्टी संपादन करण्याचा आणि त्यांना आणखी समजून घेण्याचा संकल्प करून मी त्यांना आदरांजली अर्पण करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा